Join us  

विधीलिखिताशी लढणार राया; तरी होणार कृष्णाचा मृत्यु?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 6:09 PM

Man Jhala Bajind: येत्या रविवारी मन झालं बाजिंद या मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे. या एका तासाच्या विशेष भागात कृष्णावर नवं संकट येणार आहे.

छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे मन झालं बाजिंद. ही मालिका सुरु झाल्यापासून कृष्णा सातत्याने तिच्या नशिबाशी झगडत आहे. रायाशी लग्न केल्यानंतर अनेकदा तिच्या जीववर बेतणारी संकट आली. मात्र, या संकटांना तिने परतून लावलं. यामध्येच आता राया तिची मदत करणार आहे. असं असूनही आता पुन्हा एकदा कृष्णाच्या मृत्यूचा प्लॅन रचला जाणार आहे.

येत्या रविवारी मन झालं बाजिंद या मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे. या एका तासाच्या विशेष भागात कृष्णावर नवं संकट येणार आहे. तिचं अपहरण होणार आहे. मात्र, या गोष्टीचा सुगाव लागल्यानंतर राया तिला वाचवायला जाणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कृष्णाचे प्राण वाचवण्यास राया यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

'मन झालं बाजिंद'मध्ये प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं कि, राया कृष्णासाठी विधिलिखिताशी लढतोय. कृष्णाला राया विधात्यांच्या घरी थाटामाटात आणण्याचं सांगतो आणि त्याच्या तयारीला लागतो. तर दुसरीकडे अंतरा, घुली मावशी आणि रितिक कृष्णाला जीवे मारण्याचा कट रचत आहेत. त्या कटानुसार, कृष्णा घराबाहेर पडताक्षणी तिचं अपहरण करून तिला एका निर्मनुष्य ठिकाणी ठेवण्यात येतं. रायाला या गोष्टीचा सुगावा लागताच तो तिला वाचवण्यासाठी लगबग करतो.

दरम्यान, राया विधिलिखिताशी लढून कृष्णाचं प्रेम जिंकू शकेल का? राया कृष्णाला वाचवू शकेल का? हे असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. मात्र, या प्रश्नाची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार