Join us  

आता निरोप घेतो..., अजय पुरकर यांचा ‘मुलगी झाली हो’ मालिकेला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 4:50 PM

Mulgi Zali Ho : अजय पुरकर मालिकेत राजन सरदेशमुख ही व्यक्तिरेखा साकारत होते.

‘मुलगी झाली हो’  (Mulgi Zali Ho ) ही मालिका आली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली.अगदी अनेक महिने टीआरपी चार्टवरचा पहिला नंबर या मालिकेनं सोडला नाही. पण गेल्या काही दिवसांत मालिकेचा टीआरपी घसरला आहे. त्यामुळे मालिकेची वेळ बदलून ती दुपारी 2 प्रसारित होत आहे. काही महिन्यांआधी या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना अचानक डच्चू देण्यात आला होता. राजकीय भूमिका मांडत असल्याने आपल्याला अचानक मालिकेतून काढल्याचा आरोप त्यावेळी किरण मानेंनी केला होता. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोपही रंगले होते. तूर्तास ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, आता आणखी एका अभिनेत्याने ही मालिका सोडली आहे.

मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणारे अभिनेते अजय पुरकर (Ajay purkar) यांनी मालिका सोडत असल्याचं स्वत: जाहिर केलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित त्यांनी याची माहिती दिली.  मालिकेत ते राजन सरदेशमुख ही व्यक्तिरेखा साकारत होते.

‘नमस्कार,मुलगी झाली हो या मालिकेतून मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेत आहे. खूप मजा आली काम करताना. अनेक अनुभव आले नव्यानी... खूप खूप धन्यवाद, कायम सगळे लक्षात रहाणार...पुन्हा लवकरच भेटू ...नवीन प्रोजेक्ट घेऊन....,’असं त्यांनी लिहिलं आहे. 

अजय पुरकर अलीकडे ‘पावनखिंड’ या चित्रपटात दिसले होते. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी बाजीप्रभुंची व्यक्तिरेखा जिवंत केली होती.  त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांच्या या भूमिकेचं जबरदस्त कौतुक झाला होता. लवकरच त्यांचा ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या ते सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. प्रेक्षक पुन्हा त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

टॅग्स :अजय पुरकरटेलिव्हिजनटिव्ही कलाकार