जमिनीच्या बुमनंतर बदललेल्या नात्यांचे चित्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 16:13 IST
मराठीमध्ये समकालीन विषयांवर चित्रपटांचे प्रमाण वाढत असून जमीन खरेदी-विक्री व्यवहारांचे बुम वाढल्यावर बदललेल्या नात्यांचे चित्रण ‘बरड’मध्ये करण्यात आले आहे. ...
जमिनीच्या बुमनंतर बदललेल्या नात्यांचे चित्रण
मराठीमध्ये समकालीन विषयांवर चित्रपटांचे प्रमाण वाढत असून जमीन खरेदी-विक्री व्यवहारांचे बुम वाढल्यावर बदललेल्या नात्यांचे चित्रण ‘बरड’मध्ये करण्यात आले आहे. या सगळ्याकडे व्यंगात्मक टिप्पणी करताना ‘बरड’ अंतर्मुखही करायला लावणार आहे. ‘बरड’चे पोस्टर नुकतेच रिलीज झाले. ‘रेती’ या वाळूमाफियांच्या विषयावरील चित्रपटानंतर देवेंद्र कापडणीस यांनी स्वत: लिहून निर्मिती केलेला हा चित्रपट आहे. याबाबत कापडणीस म्हणाले, ‘‘जमिनीच्या वाढलेल्या भावामुळे बदलत गेलेल्या नात्यांचे चित्रण करताना राजकारणामुळे एका गावाचे बिघडलेले सौख्य यातून मांडले आहे. ही खरं तर महाराष्टचीच प्रातिनिधिक कथा आहे. कोठेतरी प्रकल्प येणार, अशी चर्चा सुरू होते आणि तेथील जमिनींना अचानक भाव येतो. कौटुंबिक नातेसंबंध या सगळ्यांमध्ये पणाला लागतात. ‘बरड’मध्ये सांगली जिल्ह्यातील अलकुड या गावाची प्रातिनिधीक कथा आहे. गावामध्ये एक सर्व्हे सुरू होतो. एजन्सी जयपूरची असल्याने सगळे इंग्रजी बोलणारे असतात. त्यामुळे गावकºयांना काय चाललेय काही कळत नाही. त्याचदरम्यान एक अफवा पसरते, की एक प्रकल्प येणार आहे. त्यामुळे गावातील अगदी पडीक जमिनींना अचानक भाव येतो. त्यातच महसूलमंत्री आणि विद्यमान आमदारांच्या सत्तासंघर्षात खरी गोष्ट बाहेरच येत नाही. मात्र, या सगळ्या राजकारणात गावातील वातावरण मात्र नासून जाते.’’‘कोण आहे रे तिकडे,’ ‘गाजराची पुंगी’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक तानाजी घाडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. यामध्ये सुहास पळशीकर,राजन पाटील, शहाजी काळे, भारत गणेशपुरे, संजय कुलकर्णी, नंदकिशोर कुलकर्णी आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ३ जून रोजी ‘बरड’ संपूर्ण महाराष्टत प्रदर्शित होणार आहे.