'जाडूबाई जोरात'मालिकेच्या वेळेत झाला बदल,या वेळेत होणार मालिकेचे प्रसारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 14:43 IST
गेली 18 वर्ष सतत नाविन्यपूर्ण मनोरंजनाने जगभरातील मराठी प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीने भुरळ पाडली आहे. मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील पहिली ...
'जाडूबाई जोरात'मालिकेच्या वेळेत झाला बदल,या वेळेत होणार मालिकेचे प्रसारण
गेली 18 वर्ष सतत नाविन्यपूर्ण मनोरंजनाने जगभरातील मराठी प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीने भुरळ पाडली आहे. मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील पहिली दैनंदिन मालिका 'आभाळमाया' सो वा मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा झी गौरव पुरस्कार असो, किंवा जग पादाक्रांत करणारा 'चला हवा येऊ द्या' सारखा धमाल कार्यक्रम असो! झी मराठी वाहिनीने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक नेहमीच भागवली आहे. धकाधकीच्या जीवनात जेवढी दगदग वाढतेय तेवढीच ही मनोरंजनाची भूक वाढत चालली आहे. रसिकांची हीच गरज लक्षात घेऊन झी मराठीने संध्याकाळी मनोरंजनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 27 नोव्हेंबरपासून दुपारी 1 वाजता प्रक्षेपित होणारी 'जाडूबाई जोरात' ही मालिका संध्याकाळी 6 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. दररोज संध्याकाळी 6.30 वाजता होम मिनिस्टरपासून सुरु होणाऱ्या या मनोरंजनाच्या यात्रेचा शुभारंभ आता संध्याकाळी 6 वाजल्यापासून जाडूबाईअगदी जोरात करतील.वेगवेगळ्या विषयांचं कल्पक सादरीकरण हे झी मराठी वाहिनीचं वैशिष्ट्य! जाडूबाई जोरात ही मालिका याचं उत्तम उदाहरण! निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे अशा दोन दिग्गज अभिनेत्रीच्या अभिनयाची जुगलबंदी सध्या चांगलीच रंगात आली आहे. मालिकेने सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनाची पकड घेतली होती. नव्या वेळेत मालिकेची हीच पकड आता अधिक घट्ट होईल, अशी आशा मालिकेची टीम व्यक्त करत आहे. जाडबाईने जरी डाएटचा मार्ग स्वीकारला असला तरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा हा खुराक कधीही कमी होणार नाही, याची प्राइम टाईम वाढवून झी मराठीने पुरेपूर काळजी घेतली आहे. 27 नोव्हेंबरपासून संध्या. 6 ते रात्री 11 हा संध्याकाळपासून सुरु होणारा प्राइम टाईमचा प्रवास प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरणार असल्याचे मालिकेच्या टीमला विश्वास आहे.‘जाडूबाई जोरात’ मालिकेची कथा आहे जुईची.मध्यमवर्गीय घरातील एक स्त्री जिची संसार आणि नोकरी सांभाळण्याची तारेवरची कसरत सुरु आहे. जिच्या गरजा, स्वप्न मर्यादीत आहेत आणि स्वभावही साधा आणि सरळ.घरातील इतरांचा विचार करताना स्वतःकडे दुर्लक्ष झालेली अशी ही जुई.घराचा हा डोलारा सांभाळताना ऑफिसच्या कामाचाही भार उचलणारी आणि तिकडेही सर्वांच्या कामात मदत करणारी. सर्वांसाठी सर्व काही करणं हा तिचा स्वभाव असला तरी तिचा विचार मात्र कुणीच करत नाही. उलट तिच्या वाढलेल्या वजनावरुन घरी आणि ऑफिसमध्येही टिंगल उडवली जाते. दुसरीकडे जुईच्या शेजारीच राहणारी मल्लिका ही तिच्या अगदी विरुद्ध स्वभावाची. स्वतःकडे लक्ष देणारी, फिटनेस जपणारी आणि महत्त्वाकांक्षा असणारी. जुईचं हे मध्यमवर्गीय वागणं आणि ते जगणं तिला अजिबात आवडत नाही आणि तिचा जाडेपणाही तिला खटकतो. हीच मल्लिका जुईला तिच्या वाढलेल्या वजनावरुन एकदा सुनावते ज्यामुळे जुईचा अहंकार दुखावला जातो आणि मग ही जाडूबाई एक आगळा वेगळा निर्धार करते. याच जाडूबाईची गोष्ट म्हणजे ही मालिका.आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदी लेखनशैलीसाठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध लेखक राजेश देशपांडे यांच्या लेखनीतुन उतरलेली ही मालिकेने अवघ्या काही महिन्यातच रसिकांची पसंती मिळवली आहे.