Sumeet Raghavan Video:मुंबईतीलवाहतूक कोंडी हा मुंबईकरांसाठी काही नवीन विषय नाही. दिवसेंदिवस ही समस्या आणखी जटील होत चालली आहे. योग्य नियोजनाअभावी मुंबईकरांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अगदीच काही किलोमीटर अंतर जाण्यासाठी तासन् तास लागतात. वारंवार माध्यमे आणि सामाजिक संस्थांकडून तसेत अनेक कलाकार मंडळींकडून देखील यावर प्रश्न उपस्थित केले जातात मात्र, परिस्थिती जैसै थे! अशातच नुकताच सोशल मीडियावर अभिनेता सुमीत राघवनने व्हिडीओ शेअर करत वाहतूक कोंडी्च्या मुद्द्यावर आपला स्पष्ट रोष व्यक्त केला आहे.
सुमीत राघवन सोशल मीडियावर कायम सक्रिय असून त्याद्वारे बेधडकपणे आपलं मत मांडत असतो. नुकताच अभिनेत्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर वाहतूक कोंडीची दृ्श्ये दाखवणारा व्हिडीओ पोस्ट केलाय. शिवाय दरम्यान, या व्हिडीओमध्ये शेंगदाणा विकणारा मुलगा पाहून अभिनेता म्हणतो, "हा आता ब्रिजवर सुद्धा दिसायला लागलाय. काय कमाल आहे." या व्हिडिओच्या सुरुवातीला सुमित म्हणतो , " ब्रिजवरसुद्धा शेंगदाणे विकणारा दिसला की समजून जा…सावळा गोंधळ...", असं म्हणत अभिनेत्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे.
त्यानंतर पुढे अभिनेता म्हणतो,"याचं कारण असं आहे, बांद्रावरुन सांताक्रूझच्या दिशेने उतरणारा पूल, त्यावरून जे ट्रॅफिक खाली उतरतं ते, तसंच ब्रिजवरील खाली उतरणारे ट्रॅफिक आणि सांताक्रूझ स्टेशनच्या दिशेने खालून येणारं ट्रॅफिक असे तीन प्रवाह एकाच ठिकाणी येतात. त्यामुळे मला अधिकाऱ्यांना, एमएमआरडीए आणि वाहतूक विभागाला असा प्रश्न विचारायचा आहे की? तुम्ही यावर बसून ठरवत नाही का? की जर तीन प्रवाह एकाच ठिकाणी आले,तर तिकडे गोंधळच होणार आहे. हा कॉमन सेन्स असू नये? म्हणजे काय फायदा झाला करोडो रुपये खर्च करून?"
यानंतर सुमीत भीतींवर लोकांनी थुंकलं असल्याचं व्हिडीओद्वारे दाखवलं आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला कॅप्शन देत अभिनेत्याने लिहिलियं,'कॉमन सेन्सचा दुष्काळ. आनंदी आनंद गडे...इकडे तिकडे चोहीकडे..४५ मिनिटं लागली हा नवीन ब्रिज पार करायला…", अशा शब्दांत मत व्यक्त करत सुमीत राघवने संताप व्यक्त केला आहे.