बिग बॉसमध्ये सुरुवातीला इंडियावाले आणि सेलिब्रिटी असे दोन गट करण्यात आले होते.
गेल्या पाच आठवड्यात घरातून बाहेर पडलेल्या लोकांमध्ये इंडियावाले अधिक प्रमाणात आहेत. सेलिब्रिटीमध्ये केवळ एकच व्यक्ती आतापर्यंत बाहेर गेली आहे आणि तीदेखील तितकीशी प्रसिद्ध नाहीये. त्यामुळे असेच राहिले तर काही दिवसांनी घरात केवळ सेलिब्रिटी मंडळीच पाहायला मिळतील.
आतापर्यंत बिग बॉस 2मधून बाहेर पडलेले स्पर्धक ः
प्रियांका जग्गा ः प्रियांका घरात गेल्यापासूनच सगळ्यांशी भांडत होती. बिग बॉसमध्ये भांडणारी मंडळी अधिक काळ टिकतात असे म्हटले जाते. त्यामुळे प्रियांका जास्त काळ टिकेल असे सगळ्यांना वाटत होते. पण ती पहिल्याच आठवड्यात कार्यक्रमातून बाहेर पडली.
आकांक्षा शर्मा ः आकांक्षा हरयाणातील लेखिका आणि नाटकात काम करणारी अभिनेत्री आहे. आकांक्षाला इतर सेलिब्रिटींच्या तुलनेत कोणीही ओळखत नाही. त्यामुळेच बहुधा तिला घरातून लवकर बाहेर जावे लागले.
नवीन प्रकाश ः नवीन हा कोलकतामध्ये क्लासेसमध्ये शिकवणारा शिक्षक आहे. नवीन याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. तो बाहेर पडल्यानंतर इंडियावाल्यांनाच घरातून बाहेर काढले जात असल्याची चर्चा सुरू आहे.
कार्यक्रमाचा टिआरपी वाढवण्यासाठी कार्यक्रमात सेलिब्रिंटींचा तडका लागण्याची आवश्यकता असते. त्यामुळे इंडियावाल्यांना घरातून बाहेर काढले जात असल्याची चर्चा आहे.
बिग बॉसचा टिआरपी वाढवण्यासाठी कार्यक्रमात आता काही वाइल्ड कार्ड एंट्रीदेखील होणार आहेत. ये रिश्ता क्या कहलाता है या कार्यक्रमात अक्षराची भूमिका साकारणाऱ्या हिना खानने नुकताच या कार्यक्रमाला निरोप दिला. अक्षरा गेल्या आठ वर्षांपासून या कार्यक्रमाचा भाग होती. पण तिला बिग बॉसमध्ये जायचे असल्याने तिने ये रिश्ता क्या कहलाता है हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉसच्या घरात सध्या करण मेहरा आणि रोहन मेहरा दे दोघेही आहेत. हे दोघेही ये रिश्ता क्या कहलाता है या कार्यक्रमाचा भाग होते. त्यांच्यानंतर आता अक्षरा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.
काही सेलिब्रिटींना वाइल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातून घरात पाठवून टिआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि तसेच अधिकाधिक इंडियावाल्यांना बाहेर काढले जाणार आहे अशीदेखील चर्चा आहे. यात कितपत तथ्य आहे ते आपल्याला पुढील काही आठवड्यांमध्येच कळेल.