दिव्याने केवळ नववीत असताना अभिनयक्षेत्रात कारकीर्द करण्यासाठी शाळा सोडली. राधा का संगम या चित्रपटासाठी गोविंदासोबत काम करण्यासाठी किर्ती कुमार एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. त्यावेळी दिव्या त्यांच्या नजरेत आली. या चित्रपटासाठी तिला अभिनयाचे धडेही देण्यात आले होते तसेच नृत्यदेखील शिकवण्यात आले होते. पण काही कारणास्तव या चित्रपटात तिची जागा जुही चावलाने घेतली. त्यानंतर केवळ 16 वर्षांची असताना तिने बोब्बली राजा या तमीळ चित्रपटात काम केले. तिचा पहिलाच चित्रपट हिट ठरल्याने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तिने तिचा जम बसवला. त्यानंतर केवळ दोन वर्षांत विश्वात्मा या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटात तिच्यावर चित्रीत झालेले सात समुंदर पार हे गाणे आजही रसिकांच्या लक्षात आहे.
दिव्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर केवळ एका वर्षांत म्हणजे 1992-93 या कालावधीत 14 चित्रपटांमध्ये काम केले. दिवाना, शोला और शबनम, दिल क्या कसूर, गीत यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका खूप गाजल्या. दिवाना या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरकडून सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता.
दिव्या मुबंईतील जुहू या भागात लहानाची मोठी झाल्याने तिला हिंदी, इंग्रजीसोबतच मराठी देखील खूप चांगल्याप्रकारे बोलता येत होते.
शोला और शबनम या चित्रपटाच्या सेटवर तिची साजिद नाडियाडवालासोबत ओळख झाली. साजिद या चित्रपटाच्या सेटवर गोविंदाला भेटायला गेला होता. गोविंदा हा साजिदचा खूप जवळचा मित्र. गोविंदानेच साजिद आणि दिव्याची ओळख करून दिली होती. पाहाताच क्षणी साजिद दिव्याच्या प्रेमात पडला. काही महिन्यांच्या नात्यानंतर त्या दोघांनी मे 1992मध्ये लग्न केले. लग्न झाले त्यावेळी दिव्या केवळ 18 वर्षांची होती. लग्न करण्यासाठी दिव्याने इस्लाम हा धर्म स्वीकारून तिचे नाव सना ठेवले होते असे म्हटले जाते.
लग्नानंतर काहीच महिन्यानंतर म्हणजेच 5 एप्रिल 1993ला मुंबईतील वर्सोवा येथील तुलसी अपार्टंमेंट या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरून पडून दिव्याचा मृत्यू झाला. दिव्या दारूच्या नशेत असल्याने बाल्कनीमधून पडली असे म्हटले जाते.