‘बाहुबली१’मध्ये कालकेय दिसला. ‘बाहुबली2’मध्येही तो दिसेल, अशी अपेक्षा होती. पणप्रेक्षकांची निराशा झाली.
तेलंगणाच्या मेहबूबनगर जिल्ह्यातील कोडंगल या छोट्याशा गावात राहणारा प्रभाकर ‘बाहुबली’नंतर एकदम प्रकाशझोतात आला. आपल्या सध्याच्या या यशाचे संपूर्ण श्रेय तो दिग्दर्शक राजामौली यांनाच देतो.
प्रभाकरने आतापर्यंत बाहुबली-१ शिवाय इतर ४० दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. खलनायकाचीभूमिका साकारणारा प्रभाकर प्रत्यक्षात प्रचंड लाजाळू आहे. या स्वभावामुळेच आपण कधी चित्रपटांमध्ये काम करू, अशी कल्पनाही त्याने केली नव्हती. खरे तर लहानपणी प्रभाकर क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहायचा.
१२ वी पास झाल्यानंतर एका लग्नानिमित्त तो हैद्राबादला गेला असता तिथे त्याच्या एका नातेवाईकाने त्याचे भारदस्त व्यक्तिमत्त्व पाहून त्याला रेल्वे पोलीस विभागात नोकरी देण्याचे वचन दिले होते. पण नियतीने त्याच्यासाठी वेगळेच काही वाढून ठेवले होते. रेल्वे पोलिसाची नोकरी मिळेल म्हणून प्रभाकर निश्चिंत होता. त्याने सहा वर्षे वाट पाहिली. पण नोकरी मिळाली नाहीच. मग काय, कामाच्या शोधात प्रभाकर पुन्हा हैदराबादेत आला. याठिकाणी दिग्दर्शक राजमौली यांना ‘मगधीरा’साठी काही लोकांची गरज असल्याचे त्याला कळले.
एका मित्राकरवी प्रभाकरने यासाठी आॅडिशन दिले. पण इथेही निराशाच. राजमौलीकडून काही उत्तर आले नाही. मग अचानक एकेदिवशी राजमौली प्रभाकरला राजस्थानला घेऊन गेले. याठिकाणी प्रभाकरने काय केले, तर नुसते शूटींग पाहिले अन् परतला. पुन्हा पोटापाण्यासाठी काम शोधण्याची त्याची धडपड सुरु झाली. यानंतर काही दिवसांनी राजमौलीच्या कार्यालयातून त्याला फोन आला. ‘मर्यादा रमन्ना’ या चित्रपटात काम करण्याबद्दल त्याला विचारणा झाली. पण अभिनय कशाला म्हणतात, हेही प्रभाकरला ठाऊक नव्हते. मग राजमौली यांनीच त्याला देवदास कनकला येथे त्याला अभिनयाच्या ट्रेनिंगसाठी पाठवलं.
याठिकाणी प्रशिक्षणासोबत प्रभाकरला दहा हजार रुपए महिना मानधनही दिले गेले. या पैशातून प्रभाकरने स्वत:च्या डोक्यावरचे कर्ज फेडले. हाच प्रभाकरच्याआयुष्यातील टर्निंग पॉर्इंट ठरला.