१९७७ मध्ये पूनमने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर केला. यानंतर पूनमच्या सौंदर्याची महती सगळीकडे पसरली आणि पूनमला बॉलिवूडच्या अनेक आॅफर्स यायला लागल्या. पूनमने अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पण खरे तर पूनमला अभिनेत्री बनण्यात कुठलाही रस नव्हता. तिला डॉक्टर बनायचे होते.
मिस इंडियाचा किताब जिंकला तेव्हा पूनम केवळ १६ वर्षांची होती. याचदरम्यान यश चोप्रा यांनी पूनमला ‘त्रिशूल’ची आॅफर दिली. पण पूनमने ही आॅफर धुडकावून लावली. अखेर अनेक दिवसांच्या मनधरणीनंतर केवळ शाळेच्या सुट्ट्यांमध्ये काम करण्याच्या अटीवर पूनम चित्रपट करायला तयार झाली. पहिल्याच चित्रपटात संजीव कुमार, शशी कपूर, अमिताभ बच्चन यासारख्या सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी पूनमला मिळाली. पूनमचा पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला . यानंतर तिच्याकडे दिग्दर्शक -निर्मात्यांच्या रांगा लागल्या. पण पूनमने सगळ्यांना नकार दिला. पुन्हा एकदा मेडिकलला प्रवेश घेण्याची इच्छा तिने व्यक्त केली. पण भावाने तिला रोखले. यानंतर पूनमने परराष्ट्र सेवेत जाण्याचा निर्धार केला. या तयारीत तिने स्वत:ला जुंपून घेतले.
पण १९७९ मध्ये यश चोप्रांच्या ‘नूरी’मध्ये ती पुन्हा दिसली. कर्णमधूर गाणी आणि अभिनयाने सजलेला हा चित्रपटही सुपरहिट झाला. यानंतर मात्र अभिनेत्री म्हणूनच काम करायचे हे पूनमने ठरवून टाकले.
१९८८ मध्ये पूनमने निर्माता अशोक ठकेरियासोबत लग्न केले. मात्र काहीच वर्षांत दोघे विभक्त झालेत. या दोघांना दोन मुले आहेत. मुलगा अनमोल आणि मुलगी पलोमा.
सध्या दारूमुक्ती, कुटुंब नियोजन, एड्स जनजागृती अशा सामाजिक कार्यात पूनमने स्वत:ला वाहून घेतले आहे. शिवाय तिची मेकअप व्हॅन कंपनी व्हॅनिटीची स्थापना केली आहे. तिची ही कंपनी इंडस्ट्रीतील कलाकारांना मेकअपच्या सर्व सुविधा पुरवते.