नंदा ज्यावेळी पाच वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना चित्रपटात घेतले. त्यांचे वडील विनायक दामोदर कर्नाटकी यांच्या सात मुलांपैकी नंदा ही तिसरे अपत्य. खरे तर नंदा यांना त्यावेळी कॅ. लक्ष्मी यांच्याप्रमाणे व्हायचे होते. काही नाईलाजस्तव त्या चित्रपटात आल्या. आपल्या भावांना सोडून त्यांनाच का भूमिका दिली याचे त्यांना आश्चर्य वाटे. १९४८ साली प्रदर्शित झालेल्या मंदिर या चित्रपटात त्यांनी काम केले. हा चित्रपट करतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. दिनकर पाटील यांनी नंतर हा चित्रपट पूर्ण केला. व्ही. शांताराम यांच्या त्या पुतणी. पुढे त्यांनीच त्यांचा संभाळ केला. बालकलाकार म्हणून जग्गू (१९५२), शंकराचार्य, जगद्गुरू (१९५४) मध्ये काम केले.
व्ही. शांताराम यांच्या घरी एकदा लग्न होते. त्या समारंभात साडी घालून येण्याविषयी त्यांनी सांगितले. ज्यावेळी नंदा साडी घालून आल्या, त्यांना पाहून व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या पुढील चित्रपटात हिरोईन म्हणून घेणार असल्याचे सांगितले. हा चित्रपट होता तुफान और दिया (१९५६). नंदा यांच्या आयुष्यातील हा पहिला हिंदी चित्रपट. या चित्रपटानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
पुढे नंदा यांना बहिणींचे रोल अधिक प्रमाणात मिळाले. भाभी और दुल्हन, आगरा रोड, पहली रात, छोटी बहन, काला बाजार यामधील छोटी बहन चित्रपट खूप गाजला. देव आनंद सोबत हम दोनो, शशी कपूरसोबत चार दिवारी, सुनील दत्तसोबत आज और कल, उसने कहा था या चित्रपटात काम करण्यात सुरूवात केली. धुल का फूल, जब जब फुल खिले, गुमनाम, शोर, परिणीता, प्रेमरोग यासारखे त्यांनी चित्रपट केले.
देव आनंद यांच्यासोबत त्यांनी काला बझार मध्ये बहिणीची भूमिका केली होती. हम दोनोमध्ये त्या देव आनंद यांच्यासोबत हिरोईन होत्या. तीन देवियाँमध्ये त्यांची आधुनिक महिलेची भूमिका होती. देव आनंद यांनी त्यांना खूप संधी दिली. त्यांनी नंदा यांच्या अभिनयाची चाचणी घेतली.
दिलीप कुमार यांच्याबाबत त्यांना खूप आदर होता. दिलीप कुमारही त्यांना मास्टर विनायक यांची मुलगी म्हणून ओळखत होते. शेवटपर्यंत दिलीप कुमार त्यांच्याशी आदबीने बोलायचे. राज कपूर यांनीही त्यांना प्रेमरोगमध्ये संधी दिली.
शशी कपूर यांच्यासोबत त्यांची जोडी खूप गाजली. मुहब्बत इसको कहते हैं, जब जब फुल खिले, राज साब, रूठा न करो या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या.
१९६० ते १९६५ या कालावधीत नूतनबरोबरच सर्वाधिक रक्कम घेणाºया त्या अभिनेत्री होत्या. १९७३ पर्यंत त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत दबदबा होता. वहिदा रहमान, आशा पारेख, साधना आणि हेलन यांच्यासोबत त्यांची छान मैत्री होती.
१९६५ साली जब जब फुल खिले चित्रपटादरम्यान सैन्यातील एका मराठी कर्नलने लग्नाची मागणी घातली होती. ती त्यांच्या आईकडे गेली असता या प्रकरणावर पुढे काही झाले नाही. त्यांच्या भावांनीही अनेक स्थळे दाखविली, परंतु नंदा यांनी त्यास नकार दिला.
१९९२ मध्ये त्यांनी मनमोहन देसाई यांच्यासोबत लग्नाची तयारीही केली होती. मात्र दोन वर्षे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. १ मार्च १९९४ साली घरावरील पाण्याच्या टाकीवरुन उडी मारून मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केल्याने या लग्नाचा इथेच अंत झाला.
वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्या शेवटपर्यंत अविवाहित राहिल्या.