जेव्हा अमिताभ बच्चन आणि जया ‘जंजीर’ या चित्रपटात एकत्र काम करीत होते तेव्हाच त्यांच्यात प्रेमांकुर फुलले होते. त्यातच शूटिंगदरम्यान, जर हा चित्रपट यशस्वी झाला तर सगळ्यांना विदेशात फिरायला घेऊन जाणार असल्याची निर्मात्यांनी घोषणा केल्याने सगळ्यांमध्येच एक वेगळा उत्साह निर्माण झाला होता. जेव्हा चित्रपट रिलीज झाला, तेव्हा प्रेक्षकांनी त्यास भरभरून प्रेम दिले. त्यावेळी ‘जंजीर’ बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला होता अन् त्याचबरोबर इंडस्ट्रीला पहिला ‘अॅँग्री यंग मॅन’ही मिळाला होता.
चित्रपट सुपरहिट ठरल्याने निर्मात्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचे ठरविले. त्यानुसार चित्रपटाशी संबंधित सगळ्यांनीच विदेशात जाण्यासाठी तयारी केली. अमिताभ हेदेखील विदेशात फिरायला जाण्यासाठी आतुर झाले होते. त्यानुसार ते वडील हरिवंश राय-बच्चन यांना परवानगी मागण्यासाठी गेले होते. तेव्हा हरिवंश राय बच्चन यांनी, या दौºयावर जयासुद्धा येणार आहे काय? असा अमिताभ यांना प्रश्न केला. अमिताभनेदेखील लगेचच होय, असे उत्तर दिले. मात्र हरिवंश राय- बच्चन यांनी अमिताभसमोर एक अट ठेवली.
त्यांनी म्हटले की, जर तू आणि जया विदेशात एकत्र जात असाल तर तुम्हाला अगोदर विवाहबंधनात अडकावे लागेल. विवाह न करता तुम्हाला विदेशात एकत्र जाता येणार नाही. वडिलांची ही अट ऐकून अमिताभही आश्चर्यचकित झाले होते. कारण त्यावेळी त्यांच्या प्रेमाच्या जोरदार चर्चा रंगत होत्या. पुढे आजच्याच दिवशी त्यांनी १९७३ मध्ये विवाह केला. तेव्हापासून या दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. सध्या हे दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुखी असून, त्यांच्यातील प्रेम कायम आहे. असो, महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना त्यांच्या ४४व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ‘सीएनएक्स मस्ती’कडून भरभरून शुभेच्छा!