७० च्या दशकात अॅँग्री यंगमॅन अमिताभ बच्चन यांना कडवी टक्कर देणाºया विनोद खन्ना यांची त्याकाळी अमिताभ यांच्याबरोबर तुलना केली जात होती. या दोघांच्या जोडींनी तर पडद्यावर अक्षरश: मक्तेदारी निर्माण केली होती. ‘परवरिश, अमर अकबर अॅँथोनी, मुकद्दर का सिकंदर, खून पसिना, हेराफेरी, जमीर आणि रेशमा और रेशमा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यामुळे हे दोघेही त्याकाळी यशाच्या सर्वोच्च स्थानी होते. मात्र विनोद यांनी अचानकच बॉलिवूड सोडून ओशोला शरण गेल्याने इंडस्ट्रीसह त्यांच्यासह फॅन्सला मोठा धक्का बसला.
असे म्हटले जात आहे की, त्यांच्या आईच्या निधनामुळे ते खूपच निराश राहायचे. त्याचदरम्यान त्यांची भेट ओशोबरोबर झाली. या भेटीत ते ओशोपासून एवढे प्रभावित झाले की, त्यांनी आपल्या चित्रपट करिअरमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. पुढे ते पुणे येथील ओशो आश्रमात वास्तव्य करू लागले. याचदरम्यान त्यांनी पत्नी गीतांजलीला घटस्फोटही दिला. यावेळी त्यांची भेट आचार्य रजनीश ओशो यांच्याबरोबर झाली. पुढे ते रजनीश ओशो यांच्याबरोबर अमेरिकेला निघून गेले अन् तेथेच आश्रमात राहू लागले. यावेळी ओशोंनी विनोद खन्ना यांना ‘स्वामी विनोद भारती’ असे नाव दिले.
यादरम्यान त्यांनी टॉयलेटपासून ते भांडी धुण्यापर्यंतचे काम केले. तसेच ते बागकामदेखील करीत होते. कारण विनोद खन्ना यांनीच मान्य केले होते की, त्यांनी अमेरिकेत अनेक वर्षे बागकाम केले होते. त्याठिकाणी त्यांनी जवळपास चार वर्षे वास्तव्य केले. जेव्हा अमेरिकेत ओशो आश्रम बंद करण्यात आले तेव्हा विनोद यांना भारतात परतावे लागले. यावेळी त्यांनी त्यांचे सूट, कपडे, शूट आणि अन्य लग्जरी साहित्य लोकांमध्ये वाटून दिले होते.
मात्र दुसरीकडे बॉलिवूडमध्ये पुन्हा अमिताभ बच्चन यांचा शिक्का चालू लागला. त्यांनी एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले. पुढे तब्बल पाच वर्षांनंतर विनोद खन्ना पुन्हा बॉलिवूडमध्ये परतले. त्यांनी ‘इन्साफ’ या चित्रपटातून नव्या इनिंगला सुरुवात केली. मात्र त्यावेळी अमिताभ विनोदच्या तुलनेत खूपच पुढे गेले होते, तर विनोद खन्ना हे त्यांचे स्टारडम गमावून बसले होते.