तुम्ही कधी मारली कुणाला थाप? ती समोरच्याला पचली की तुम्ही तोंडावर आपटलात? तुमचा एखादा मित्र आहे का थापाड्या? थाप मारताना धमाल मज्जा येते ना? मग सज्ज व्हा अशाच एका भन्नाट ‘थापाड्या’ला भेटायला. मानसी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, मास्क ग्रुप प्रस्तुत धमाल विनोदी, फुल टू मनोरंजन करणारा, अजित बाबुराव शिरोळे दिग्दर्शित ‘थापाड्या’ हा मराठी चित्रपट ४ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
भाऊसाहेब भोईर, शरद म्हस्के यांची निर्मिती असलेल्या ‘थापाड्या’ मध्ये अभिनेता अभिनय सावंत, मानसी मुसळे, सोनाली गायकवाड, ब्रिंदा पारेख, मोहन जोशी,कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, दीपक करंजीकर, सुनील गोडबोले, विनीत भोंडे, संतोष रासने, प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर वास्तूतज्ज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर विशेष भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षकांमध्ये ‘थापाड्या’ या चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित बाबुराव शिरोळे दिग्दर्शित ‘थापाड्या’ हा एक रॉमकॉन शैलीतील चित्रपट असून यामध्ये सस्पेन्स आणि थ्रीलरचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. सोबतच ठसकेबाज लावणीची अदाकारी यामध्ये दिसणार आहे.
‘थापाड्या’ची कथा, संकल्पना भाऊसाहेब भोईर यांची, कथा नितीन चव्हाण यांची तर पटकथा, संवाद समीर काळभोर यांचे आहेत. गीतकार गुरु ठाकूर, अभय इनामदार, मंदार चोळकर आणि जयंत भिडे यांच्या गीतांना संगीतकार पंकज पडघन, चैतन्य आडकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर गायक आदर्श शिंदे, बेला शेंडे, आनंदी जोशी, सायली पंकज यांचा स्वरसाज गाण्यांना चढला आहे. चित्रपटाचे डीओपी सुरेश देशमाने आहेत, तर नृत्यदिग्दर्शन लॉजिनिअस, फुलवा खामकर, निकिता मोघे यांचे आणि कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. निर्मिती सहाय्य संतोष शिंदे, तर निर्मिती सूत्रधार डिंपल जैन आहेत. ‘थापाड्या’नक्की कोण आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे.
"या क्षेत्रापासून थोडा लांबच राहिलो असल्याने आज दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘थापाड्या’ सारख्या नावाच्या चित्रपटाला त्यामुळे काही लोकांच्या मनात प्रश्न येणे साहजिकच आहे. मात्र गेल्या तीन साडेतीन वर्षापासून आपण सगळेच बघतो आहोत की कशाप्रकारे थापा चाललेल्या असून लोकांना बनवण्याचे काम चालू आहे. कदाचित त्याच्यातूनच भाऊ साहेबांना ‘थापाड्या’ हे नाव सुचले असावे असे मला वाटते आहे. मी जरी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी मी त्या भूमिकेतून हे बोलत नसून आता सहनशीलतेचा अंत झाला आहे असे मला वाटते. पण आता लोकांना जाणवू लागले आहे, की हे फसवण्याचे काम चालू आहे त्यावेळस मग कोणीही असले तरी लोक गप्प बसत नाहीत आणि म्हणूनच या चित्रपटाला ‘थापाड्या’ हे नाव समर्पक आहे".असे भाऊसाहेब भोईर म्हणाले.
सोशल मिडीयावर प्रदर्शित झालेल्या 'थापाड्या' या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.