Join us  

स्वप्निल जोशीने सध्या कामातून काही दिवसांचा ब्रेक घेतला असून अशाप्रकारे कुटुंबियांसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 6:30 AM

उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की, कामापासून थोडा उसंत घेत आपल्या जीवलगांसोबत वेळ घालवण्याचा हक्काचा कालावधी मिळतो. यावेळी प्रत्येकजण कुठेतरी दूर ...

उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की, कामापासून थोडा उसंत घेत आपल्या जीवलगांसोबत वेळ घालवण्याचा हक्काचा कालावधी मिळतो. यावेळी प्रत्येकजण कुठेतरी दूर थंड ठिकाणी किंवा आपापल्या गावी जाण्याचा बेत आखत असतात. तर काहीजणांना समर केम्प अधिक भावतात. 'मे' महिन्याच्या रखरखत्या उन्हात, सुट्टीवर जाताना स्वतःसोबतच कुटुंबियांच्या आरोग्याचीदेखील विशेष काळजी घ्यावी लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मराठीचा सुपरस्टार स्वप्निल जोशी यंदाचा समर व्हेकेशन एका हटके अंदाजात आपल्या कुटुंबीयांसोबत घालवत आहे. 'रणांगण' चित्रपटात गेली दोन वर्षं व्यग्र असलेल्या स्वप्निलला बायको मुलांना अधिक वेळ देता आला नव्हता, त्यामुळे या उन्हाळी सुट्टीत तो पूर्ण महिनाभर घरात व्हेकेशनची मज्जा लुटणार आहे... त्याच्या या होमरेस्ट व्हेकेशनबद्दल त्याच्याशी केलेली ही बातचीत... यावर्षीच्या समर व्हेकेशनला कुठे जाण्याचा बेत आहे का? नाही. खरं तर कामामुळे मी सतत कुठे ना कुठे प्रवास करत असतो. त्यामुळे जर थोडा वेळ मिळाला तर मी सर्वात आधी घरचा रस्ता धरतो. 'रणांगण' सिनेमाच्या चित्रीकरणात आणि त्यानंतर त्याच्या प्रमोशन कार्यक्रमात मी खूप व्यग्र होतो. घरापासून बरेच महिने दूर राहिल्यामुळे मी होमसिक झालो होतो. माझ्या दोन लहान मुलांना तसेच आई, बाबा आणि बायकोला मी त्यांचा हक्काचा वेळ देऊ शकत नव्हतो. त्यामुळे, आता मला चांगला उसंत मिळाला असून, कुठे बाहेर जाण्यापेक्षा घरच्यांसोबत घरातच समर व्हेकेशनचा आनंद लुटण्याचा मी विचार केला आहे. मायरा आणि राघवसोबत खेळताना दिवस कधी जातो हे कळतसुद्धा नाही. शिवाय, त्यांच्यासोबत खेळताना मला सुद्धा लहान झाल्यासारखे वाटते... व्हेकेशन म्हणजे नेमके काय असते? नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण निवांत आणि मन प्रसन्न करण्यासाठी केलेली जाणारी कृतीच ना ! ती तर मी अशीदेखील करतो आहे !या सुट्टीत तुझा दिनक्रम काय आहे? तूर्तास, कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचाच बेत आहे. माझे घर २३ व्या मजल्यावर असल्याने माझ्यासाठी तेच हिल स्टेशन आहे. छान सूर्यप्रकाश आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य माझ्या खिडकीतून दिसते. सकाळची कोवळी किरणे आमच्या खोलीत पडतात. रोज सकाळी मी सूर्यनमस्कार घालतो आणि काहीवेळ व्यायाम करून दिवसाची सुरुवात करतो. त्यानंतर चहा नाश्ता झाल्यावर सोशल साईटवरून आणि प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी जाणून घेतो. सध्या घरातच आराम करायचा बेत असल्यामुळे दुपारी एखादे छानसे पुस्तक वाचण्याचा माझा विचार आहे. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते, लहान मुलांना अधिक जपावे लागते. तू याबद्दल काय सांगशील?तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी उन्हाची काहिली गेल्या वर्षीपेक्षा अधिक वाढली असल्याचा माझा अनुभव आहे. त्यामुळे ऊन्हात खूप काळ फिरणं, जास्त प्रमाणात शारीरिक श्रम करणं, अतिव्यायाम करणं शक्यतो टाळाच. मी साधे जेवण जेवतो. गरम पाण्याने अंघोळ करणे टाळतोच. गरम पडणाऱ्या वस्तू शक्यतो कमी प्रमाणात खाव्यात असे मी लोकांना सांगेन. शरीरातील तापमान नियंत्रित करण्यासाठी थंड गुणधर्म असणाऱ्या पदार्थाचे सेवन यावेळी करायला हवे. पण त्यासाठी कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा नारळ पाणी किंवा इतर फळांचा रस प्यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण मुबलक ठेवता कसे येतील ते पहा. माझे घर उंचावर असल्यामुळे उन, पाऊस आणि थंडीचा थेट परिणाम आम्ही दरवर्षी अनुभवत असतो. त्यामुळे माझ्या मुलांसाठी मी बेडरूमचे तापमान त्यानुसार बदलत असतो. लहान मुलांना लगेच गरम होते, घामामुळे त्यांच्या अंगाला खाज येऊ शकते. माझा मुलगा राघव पाच महिन्याचा असल्यामुळे त्याच्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच उन्हाळ्यात लहान मुलांना प्रवासाला घेऊन जाण्यापेक्षा त्यांच्यासाठी घरातच चांगली सोय उपलब्ध करून देणे सोयीचे ठरेल, असे मला वाटते.उन्हाळ्यात काय करावे आणि काय करू नये असे तुला वाटते? शरीरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी फळं आणि भाज्यांचे रस, सरबत आणि द्रवपदार्थांचं खूप सेवन केलं पाहिजे. ज्वारी, नाचणी, मूग अशा थंड गुणधर्माची धान्यं जरूर खावीत. याचबरोबर गायीचं दूध, वरणभात, खिचडी असे पचायला हलके असलेल्या पदार्थांचं सेवन करावं. या काळात अन्न खराब लगेच होत असते, त्यामुळे ताजे जेवण खावे. शिळे अन्न खालल्यामुळे पित्त उसळण्याची खूप शक्यता असते. उन्हाळ्यात या गोष्टी सांभाळल्या तर सुट्टीची मज्जा खऱ्या अर्थाने सार्थकी ठरेल.या समर व्हेकेशननंतर तुझे पुढचे प्रकल्प कोणते आहेत ?या सुट्टी नंतर माझे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत... ते म्हणजे 'मुंबई पुणे मुंबई ३' आणि 'मी पण सचिन' या दोन चित्रपटांच्या कामात मी व्यस्त होणार आहे. माझे फॅन्स मुंबई पुणे मुंबई ३ ची आतुरतेने वाट बघत आहेत. त्यांनी मुंबई पुणे मुंबई च्या पहिल्या दोन भागांना खूप चांगला प्रतिसाद दिला होता आणि या तिसऱ्या भागाला देखील ते चांगला प्रतिसाद देतील असा मला विश्वास आहे त्याचबरोबर 'मी पण सचिन' हा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहे या चित्रपटाला देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद मिळेल यात काही शंका नाही आणि मी सुद्धा या दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट बघत आहे.     Also Read : ranangan marathi movie review : स्वप्निल जोशीच्या इमेजला छेद देणारे रणांगण