२०१६ साली 'सैराट' (Sairat Movie) हा ब्लॉकबस्टर सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटातून आर्ची आणि परशा घराघरात लोकप्रिय झाले. या दोघांशिवाय सल्या आणि लंगड्या या पात्रांनाही प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. लंगड्याची भूमिका अभिनेता तानाजी गळगुंडे(Actor Tanaji Galgunde)ने साकारली होती. या भूमिकेतून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. दरम्यान तानाजीने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील वेदनादायी अनुभव सांगितला.
अभिनेता तानाजी गळगुंडेला वयाच्या २२ व्या वर्षी ७ वेळा पायाची सर्जरी करावी लागली होती. याबद्दल त्याने राजश्री मराठीच्या मुलाखतीत सांगितले होते. तो म्हणाला की, त्याला बालपणापासून सायकल चालवायची आवड होती. त्याच्या गावाजवळ कॉलेज नव्हते. त्यामुळे कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला असताना रोजचा प्रवास बेंबळे ते टेंभुर्णी गाव असा साधारण १४ किलोमीटर करावा लागत होता. हा प्रवास तो सायकलने करत होता.
'सैराट'मुळे बदललं तानाजीचं आयुष्य
'सैराट' सिनेमामुळे तानाजीचे आयुष्य बदलून गेले. सिनेमाचे शूटिंग, पुण्यात राहावे लागत असल्यामुळे सायकल मागे पडली. त्याच काळात त्याच्या पायाला गंभीर समस्या होऊ लागल्या. त्याने सांगितले की, "माझी मांडी आणि घोट्याजवळची हाडे लहानपणापासून बेंड होती का नंतर झाली मला माहित नाही. २२ वर्षांपर्यंत त्रास जाणवला नाही. पण नंतर गुडघे सुजायला लागले आणि चालणेदेखील कठीण झाले. डॉक्टरांनी एक्स-रे काढल्यावर समजले की वजनाचा ताण योग्य प्रमाणात गुडघे आणि पंजा यांच्यात विभागला जात नाही. तिरक्या हाडांमुळे खुब्याजवळ हाडे एकमेकांना घासत होती. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितले, मांडीचे आणि गुडघ्याचे हाडे सरळ करावे लागतील. मग त्याच्या सात सर्जरी कराव्या लागल्या. "