कॉलेजविश्वातल्या ‘अनकन्डिशनल’ मैत्रीला सेलिब्रेट करणा-या ‘दोस्तीगिरी’ सिनेमाला सध्या महाराष्ट्रभरात सर्वत्र भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सिद, सॅम, शिव, पूर्वा आणि अर्पिताच्या ‘दोस्तीगिरी’तली निखळ, नि:स्वार्थ मैत्री प्रेक्षकांना खूप भावतेय.नुकत्याच लोकमत कार्यालयाला दिलेल्या भेटीतून दोस्तीगिरीचे पैलू कलाकारांनी सांगितले. अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स आणि मोरया मुव्हिज क्रिएशन्स निर्मित दोस्तीगिरी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद मनोज वाडकर ह्यांनी लिहीले आहेत. ते ह्याविषयी म्हणतात, “सध्या आम्ही वेगवेगळ्या शहरातल्या सिनेमाघरांना भेट देत आहोत. फिल्म पाहताना प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रियांनी आम्हांला सिनेमावर घेतलेले कष्ट फळाला आल्यासारखे वाटत आहेत.”
प्रस्तुतकर्ता सुनील जैन म्हणतात, “हा चित्रपट फक्त कॉलेजच्याच विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, हा एक कौटूंबिक चित्रपट आहे. कॉलेज विश्व आणि त्या दिवसांतली बहरणारी मैत्री ह्यावर दोस्तीगिरी हा सिनेमा आहे. ह्या कथेतली पाच मित्र-मैत्रिणींची ‘दोस्तीगिरी’ आपण प्रत्येकजण आपल्या महाविद्यालयीन जीवनात जगलो असल्याची भावना आम्हांला प्रतिक्रिया देणा-या अनेकांनी व्यक्त केली आहे.”
चित्रपटाचे दिग्दर्शक विजय शिंदे सांगतात, "दोस्तीगिरी पाच जिवलग मित्र-मैत्रिणींची कथा आहे. मनोज वाडकर ह्यांनी आजच्या कॉलेज युवकांच्या भाषेत सिनेमाचे संवाद लिहिल्याने सिनेमा खूपच मनोरंजक झाला आहे. सिनेमाचे निर्माते कैलासवासी संतोष पानकर ह्यांनी हा सिनेमा घेऊन यायचे स्वप्न तीन वर्षांपूर्वी पाहिले होते. पण दूर्देवाने त्यांचा एक महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यांचे स्वप्न आता २४ ऑगस्टला पूर्णत्वास येत असल्याचे समाधान आहे."
संकेत पाठक सिनेमाविषयी सांगतो, “आम्ही सर्वांनीच हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी कसून मेहनत केली आहे. मी ह्या सिनेमात सॅम ही भूमिका करतोय. आणि योगायोगाने माझे वडिलही मला प्रेमाने सॅम हाक मारायचे. त्यामूळे ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. ह्या चित्रपटाव्दारे मी सिेनेसृष्टीत पदार्पण करतोय. त्यामूळे ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा काय प्रतिसाद मिळतोय, हे जाणून घ्यायला मी खूप उत्सूक आहे. ”
अक्षय वाघमारे सांगतो, “मी युवापिढीविषयक असणा-या अनेक सिनेमांतून काम केले. पण दोस्तीगिरी खूप वेगळा सिनेमा आहे. ह्या सिनेमाच्या सेटवर मला जीवाभावाचे मित्रमैत्रिण मिळाले, आमची सेटवर झालेली खरीखूरी बॉन्डिंगच तुम्हांला सिनेमातून पाहायला मिळणार आहे."
पूजा जयस्वाल म्हणते, “प्रत्येकासाठीच आपल्या कॉलेजमधली मैत्री खूप खास असते. सिनेमा पाहताना तुम्हांला आपल्या कॉलेजचीच आठवण होईल. मैत्रीच्या नात्यातले वेगवेगळे कंगोरे तुम्हांला ह्या सिनेमात पाहायला मिळतील.”
विजय गीते सांगतो, “मैत्रीच्या अल्लड, खोडकर नात्याविषयीचा सिनेमा असला तरीही पाच मित्रांच्या दोस्तीची मॅच्युअर्ड वाटचाल तुम्हांला सिनेमात दिसेल. आणि ही स्वत:चीच कथा पाहत असल्याची तुम्हांला जाणीव होईल."
पूजा मळेकर म्हणते,”दोस्तीगिरी सिनेमाच्या चित्रीकरणावेळीच मला जीवाभावाचे दोस्त मिळाले. जेवढी दोस्ती घट्ट, तेवढी मस्ती जास्त... हाच आमच्याही दोस्तीचा नियम आहे. आमची हीच दोस्ती आणि त्यातली मस्ती तुम्हांला मोठ्या पडद्यावरही 24 ऑगस्टला पाहता येईल. “
तरूणाईचे लक्ष वेधून घेणारे डायलॉग्स, सुश्राव्य संगीत, आणि युवा कलाकारांमूळे सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा दोस्तीगिरी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मराठी आणि बॉलीवूड सिनेसृष्टीत नावजलेली संगीतकार जोडी रोहन-रोहन ह्यांनी ह्या सिनेमाचे संगीत दिले आहे. तर प्राजक्ता शुक्रे, मीनल जैन, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, कविता राम आणि सावनी रविंद्र ह्यांनी गाणी गायली आहेत.
'अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स' प्रस्तूत 'मोरया मुव्हिज क्रिएशन्स' निर्मित ‘दोस्तीगिरी’ सिनेमाचे लेखन मनोज वाडकर ह्यांनी केले आहे. संतोष पानकर निर्मित, रोहन-रोहन ह्यांच्या संगीताने सजलेल्या ह्या सिनेमात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पुजा मळेकर, पुजा जयस्वाल, शरद पोंक्षे आणि शुभांगी लाटकर हे मुख्य भूमिकेत दिसतील. ‘दोस्तीगिरी’ 24 ऑगस्टलासंपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.