Join us  

‘फर्जंद’ सिनेमाला मिळतोय रसिकांचा उदंड प्रतिसाद,कलाकरांनी चाहत्यांसह सेल्फी क्लिक करत केले सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 4:36 AM

कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या ‘फर्जंद’ या सिनेमाचं सर्वच स्तरांवरून कौतुक होत आहे.‘फर्जंद’ चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून ...

कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या ‘फर्जंद’ या सिनेमाचं सर्वच स्तरांवरून कौतुक होत आहे.‘फर्जंद’ चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला मुंबई, पुणे व इतर शहरामध्ये दमदार ओपनिंग मिळाले असून प्रेक्षकांचा ओघ सतत सुरू आहे.‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेल्या ‘फर्जंद’चे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकाने केलं आहे. चित्रपटाचे सहनिर्माते संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार आहेत.चित्रपटाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे यातील महत्त्वपूर्ण मध्यवर्ती भूमिका साकारणारा कोंडाजी फर्जंद.ही भूमिका अंकित मोहन या कलाकाराने साकारली आहे.सर्व कलाकारांचे अप्रतिम अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू ठरली आहे. महाराष्ट्रातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये घसघशीत यश मिळवीत बॉक्स ऑफिसवर 'हाउस फुल्ल' कलेक्शन करीत सुपरहिट चित्रपटाचा मान ‘फर्जंद’ने पटकावला आहे. बऱ्याच शहरांत प्रेक्षकांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे ‘फर्जंद’चे शोज् वाढवले गेलेत. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर व समीक्षकांनीही ‘फर्जंद’ला पसंतीची पावती दिली आहे.रसिकांनी हा चित्रपट उचलून धरल्याचा आनंद निर्मात्यांनी व्यक्त करतानाच,‘चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा वाढविण्याचा प्रयत्न सार्थक झाल्याचे समाधान’ ही व्यक्त केले. चित्रपटगृहात ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत सर्व चित्रपटगृहे ‘फर्जंद’मय झालेली पाहायला मिळत आहेत.‘फर्जंद’ सिनेमा पाहिलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक सुंदर कलाकृती पाहिल्याचा अनुभव पाहायला मिळत आहे. सिनेमागृहातून बाहेर पडणाऱ्यांच्या ओठांवर ‘फर्जंद’चेच गुणगान आहे. सर्वजण सिनेमातील संवादांपासून-गाण्यांपर्यंत आणि अभिनय, अॅक्शनपासून-व्हिएफएक्सपर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं कौतुक करत आहेत.रसिक-प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणाऱ्या ‘फर्जंद’ची घौडदौड मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात अनेक विक्रमांवर नाव कोरणाऱ्या 'बाहुबली'  या चित्रपटातील भव्यदिव्यता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.त्यामुळेच बाहुबलीला ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद मिळाला होता.या सिनेमानंतर अशा प्रकारच्या भव्य-दिव्य सिनेमांची स्वप्नं अनेकांना पडू लागली असताना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या मातृभाषेतील मराठी सिनेसृष्टीने एक पाऊल पुढे टाकत बाजी मारली आहे.‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमाचे प्रोमोज पाहून बाहुबली सिनेमाची आठवण झाली असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केले आहे.