Join us

दिलीप कुमारने का नाकारला होता ‘बागबान’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 16:10 IST

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांना अभिनयाचे सम्राट मानले जाते. पन्नास आणि साठच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविलेल्या दिलीप कुमारांची ...

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांना अभिनयाचे सम्राट मानले जाते. पन्नास आणि साठच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविलेल्या दिलीप कुमारांची क्रेझ आजही कमी झाली नाही. वयाच्या ९४ व्या वर्षीदेखील ते अधूनमधून चर्चेत येत असतात.नुकतीच त्यांच्याविषयी एक रंजक गोष्ट बाहेर आली आहे. ‘बागबान’ हा चित्रपट दिलीप कुमार यांनी करावा अशी प्रख्यात सिनेनिर्माते बी. आर. चोप्रा यांची इच्छा होती; परंतु दिलीपसाहेबांनी ही आॅफर धुडकावून चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. ‘बागबान’ चित्रपट ज्या कादंबरीवर आधारित आहे तिच्या लेखिका आचला नगर यांनी याबाबत खुलासा केला.बी. आर. चोप्रांनी आॅफर दिल्यावर दिलीप कुमार यांनी चित्रपटात त्यांच्या आवडीच्या नायिकेची निवड करू न शकल्याने मनाई केली. त्यानंतर वीस वर्षांनी २००३ साली अमिताभ बच्चन यांना घेऊन मग ‘बागबान’ तयार झाला. नगर म्हणतात की, ‘चित्रपटात नर्गीस किंवा मीना कुमारी यांनी काम करावे असे दिलीप कुमार यांना वाटत असे. परंतु दोघींचेसुद्धा त्यावेळी निधन झालेले होते. राखीनेसुद्धा अभिनयातून संन्यास घेतला होता. तत्कालिन कोणतीच अभिनेत्री दिलीपसाहेबांना लायक न वाटल्यामुळे त्यांनी चित्रपट सोडला.’दिलीप कुमार यांना त्याकाळातील अभिनेत्रींवर पूर्ण विश्वास नव्हता की, त्यांच्या पातळीवर, त्यांच्या नावाला योग्य न्याय देऊ शकेल. म्हणून त्यांना ‘बागबान’ सोडला. शिवाय त्यांचे वयदेखील कारणीभूत ठरले. अनेक वर्षे ही पटकथा तशीच ठेवल्यानंतर चोप्रांनी ती त्यांचा मुलगा रवीला दिली. त्याने अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनीला घेऊन ‘बागबान’ बनवला.समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही या चित्रपटाला डोक्यावर घेतले. बिग बी आणि ड्रीम गर्ल एवढ्या वर्षांनंतर पुन्हा एकत्र आल्यामुळे प्रेक्षकांना विशेष उत्सुकता होती. वृद्धपकाळात मुले कसे दुर्लक्ष करतात याविषयी हा चित्रपट होता.