Join us  

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर पुन्हा गंभीर आरोप, म्हणाली, "चित्रपट चालण्यासाठी ते माझ्याकडे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 2:35 PM

राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान वादात आता बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने उडी घेतली आहे. तनुश्रीने नुकताच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मीटूबद्दल बोलताना तनुश्रीने नाना पाटेकरांवरही गंभीर आरोप केले आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान यांच्यात वाद सुरू आहे. या वादात आता बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने उडी घेतली आहे. तनुश्रीने नुकताच राखीचा पती आदिल खानबरोबर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने राखी सावंतवर अनेक आरोप केले. राखीमुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्याचा खळबळजनक आरोप तनुश्रीने केला. तनुश्रीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मीटूचा उल्लेख केला. मीटूबद्दल बोलताना तनुश्रीने नाना पाटेकरांवरही गंभीर आरोप केले आहेत. 

प्रेस कॉन्फरन्समध्ये तनुश्रीला नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्रींबाबत प्रश्न विचारण्यात आला. तनुश्रीने मीटू मोहिमेत नाना पाटेकरांबरोबरच विवेक अग्निहोत्रींवरही आरोप केले होते. "ज्या लोकांमुळे तुझं करिअर खराब झालं त्यांच्या चित्रपटांना नॅशनल अवॉर्ड मिळत आहे. विवेक अग्निहोत्रींच्या 'द व्हॅक्सीन वॉर' चित्रपटात नाना पाटेकरही आहेत", असं तनुश्रीला विचारण्यात आलं. यावर तिने उत्तर देताना पुन्हा नाना पाटेकरांवर आरोप केले. 

तनुश्री म्हणाली, "नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्रींबाबत आपण का बोलत आहेत? त्यांच्याबद्दल बोलून मला त्यांना प्रसिद्धी द्यायची नाही. आजही त्यांना त्यांचे चित्रपट चालवण्यासाठी माझ्या नावाची गरज भासते. २००८मध्ये नाना पाटेकरांचं माझ्याबरोबर भांडण झालं होतं तेव्हादेखील त्यांचा चित्रपट चालला नव्हता. जेव्हा त्यांचे चित्रपट चालत नाहीत. तेव्हा ते माझ्यासारख्या लोकांकडे येतात. जेणेकरुन, मी त्यांच्या चित्रपटात आयटम साँग करेन आणि त्यांचे चित्रपट चालतील."

"मीडिया त्यांच्या चित्रपटांबाबत तनुश्रीला विचारेल आणि त्यांचे चित्रपट चालतील. मी काहीतरी बोलेन ज्यांच्यामुळे त्यांच्या चित्रपटाला प्रसिद्धी मिळते. मला त्यांच्या चित्रपटाला कोणत्याही पद्धतीने प्रसिद्धी द्यायची नाही," असंही तनुश्री पुढे म्हणाली.  

टॅग्स :तनुश्री दत्तानाना पाटेकरबॉलिवूडसेलिब्रिटी