शशी कपूर यांना त्र्यंबकेश्वरला उभारायचे होते भव्य रुग्णालय, मात्र स्वप्न राहिले अधुरेच...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 13:57 IST
बॉलिवूडमध्ये कपूर घराण्याला प्रचंड महत्त्व आहे. मात्र कपूर घराण्याच्या केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर सामाजिक कार्यातही प्रचंड योगदान राहिले आहे. ...
शशी कपूर यांना त्र्यंबकेश्वरला उभारायचे होते भव्य रुग्णालय, मात्र स्वप्न राहिले अधुरेच...!
बॉलिवूडमध्ये कपूर घराण्याला प्रचंड महत्त्व आहे. मात्र कपूर घराण्याच्या केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर सामाजिक कार्यातही प्रचंड योगदान राहिले आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यापासूनच कपूर घराणे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत आले आहे. त्यामध्ये दिवंगत अभिनेते शशी कपूूर यांचेही योगदान आहे. शशी कपूर यांचे वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले असून, त्यांची एक इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे. होय, शशी कपूर यांचे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सर्वसामान्यांसाठी भव्य रुग्णालय उभारायचे होते, परंतु त्यांचे हे स्वप्न अखेरपर्यंत पूर्ण होवू शकले नाही. शशी कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर त्याकाळी नियमितपणे त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला यायचे. त्यावेळी राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर हेदेखील त्यांच्यासोबत याठिकाणी येत असत. वास्तविक कपूर घराण्याला त्र्यंबकेश्वरचे वेगळेच आकर्षण राहिले आहे. त्यामुळेच आजही कपूर घराण्याच्या संपूर्ण वंशावळी त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितांकडे पहावयास मिळतात. केवळ कपूरच नव्हे तर अनेक दिग्गज कलाकार आणि राजकीय नेत्यांच्या वंशावळी येथे उपलब्ध आहेत. खरं तर त्र्यंबकेश्वर ही संतांची भूमी आहे. दर बारा वर्षांनी आयोजित केल्या जाणाºया कुंभमेळ्यासाठी जगभरातील करोडो भाविक याठिकाणी येत असतात. केवळ कुंभमेळाच नव्हे तर येथील निसर्गही पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. अनेकांना तर येथील निसर्ग आरोग्यदायी ठरत आला आहे. त्यामुळेच अनेक दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लोक याठिकाणी येऊन उपचार घेतात. येथील हवामान त्यांच्या आजारावर मात करण्यासाठी लाभदायी ठरत आले आहे. हाच विचार करून दिवंगत अभिनेते शशी कपूर यांनी याठिकाणी भव्य रुग्णालय उभारण्याचे स्वप्न बघितले होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन नगराध्यक्ष स्व. उगले यांची भेट घेऊन याठिकाणी भव्य रुग्णालय असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पृथ्वीराज कपूूर यांच्या निधनानंतर शशी कपूर यांनी तीस वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वरला भेट दिली होती. त्यावेळच्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले होते की, येथील निसर्ग खूप निसर्गरम्य आहे. मलाही याठिकाणी नेहमी यायला आवडेल. इथे राहणारे नागरिक खूप नशीबवान आहेत, असे म्हणत त्यांनी सर्व त्र्यंबकवासीयांचे आभार मानले होते. त्र्यंबकेश्वरमध्ये त्याकाळी सामान्यांच्या मनोरंजनासाठी काही सोय नव्हती. त्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष स्व. केशवराव उगले यांनी गावात २४ सार्वजनिक दूरदर्शन संच बसवण्याचे काम हाती घेतले होते. त्यातील कुशावर्तावरील एक टीव्ही संचाचे उद्घाटन दिवंगत अभिनेते शशी कपूर यांच्या हस्ते झाले होते. तेव्हा त्र्यंबकेश्वरवासीयांनी केलेल्या अगत्यशील आदरातिथ्याने दिवंगत शशी कपूर भारावले होते.