संजय म्हणाला, मी अतिरेकी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 09:06 IST
संजय दत्तची गुरुवारी शिक्षा पूर्ण होण्याच्या १०३ दिवस आधीच तुरुंगातून सुटका झाली. पुण्याच्या येरवडा तुरुंगातून निघताना संजय अतिशय भावूक ...
संजय म्हणाला, मी अतिरेकी नाही
संजय दत्तची गुरुवारी शिक्षा पूर्ण होण्याच्या १०३ दिवस आधीच तुरुंगातून सुटका झाली. पुण्याच्या येरवडा तुरुंगातून निघताना संजय अतिशय भावूक झालेला दिसला. घरी परतल्यानंतर तर त्याला अश्रू अनावर झाले. मीडियाशी बोलतानाही त्याचा स्वर कापरा झाला. मी अतिरेकी नाही. मला टाडाअंतर्गत आरोप आणि कट रचल्याच्या आरोपांतून मुक्त करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मला आयपीसी कलम १२० बी आणि टाडाअंतर्गत आरोपातून मुक्त केले होते. मला शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत शिक्षा झाली आणि नियमानुसार मी ती भोवली. तेव्हा कृपया माझ्याबद्दल लिहितांना १९९३ च्या स्फोटाचे प्रकरण असा उल्लेख टाळा, अशी आर्जवी विनंती संजयने मीडियाला केली.निळा शर्ट आणि जीन्स घातलेला संजय एक मोठी बॅग घेऊन सकाळी पावणे नऊच्या सुमारास येरवडा तुरुंगातून बाहेर पडला. तुरुंगातून बाहेर पाऊल ठेवताच त्याने भूमातेला स्पर्श केला आणि तुरुंगाच्या इमारतीवर लावलेल्या तिरंग्याला सलाम ठोकला. यानंतर तो आपल्या कारमध्ये बसला. कारमध्ये पत्नी मान्यता आणि संजयची दोन मुले इकरा व शहरान त्याची प्रतीक्षा करीत होते.