Join us  

"त्यांनी इतरत्र स्पर्श करण्यास सुरुवात केली, आणि..."; लहानपणी डॉक्टरांनी केला नीना गुप्ता यांचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 1:40 PM

Neena gupta : वरवरुन सुंदर वाटणाऱ्या जीवनात त्यांनी किती खस्ता खाल्ल्यात, किती संघर्ष केला हे सारं काही त्यांनी सांगितलं आहे.

ठळक मुद्दे"सच कहूँ तो" या आत्मचरित्रात नीना गुप्ता यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

बेधडक आणि रोखठोकपणे व्यक्त होण्याच्या शैलीमुळे अभिनेत्री नीना गुप्ता (neena gupta) कायमच चर्चेत असतात. कलाविश्वात सक्रीय असलेल्या नीना गुप्ता गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत येत आहेत. अलिकडेच त्यांचं 'सच कहूँ तो' (sach kahu toh) हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. या आत्मचरित्रामध्ये नीना गुप्ता यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. वरवरुन सुंदर वाटणाऱ्या जीवनात त्यांनी किती खस्ता खाल्ल्यात, किती संघर्ष केला हे सारं काही त्यांनी सांगितलं आहे. याच आत्मचरित्रामध्ये त्यांनी एक खळबळजनक गोष्टीचा उलगडा केला आहे. लहान वयात असतानाच त्यांना विनयभंगाचा सामना करावा लागला असं त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे.

शालेय जीवनात असताना त्यांना विनयभंगासारख्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे डॉक्टरांनीच त्यांचा बाल वयात विनयभंग केला, असा खुलासा त्यांनी या आत्मचरित्रात केला आहे. 

"मी लहान असताना भावासोबत डॉक्टरांकडे गेले होते. त्यावेळी माझा भाऊ डॉक्टरांच्या केबिन बाहेर थांबला होता. मी एकटीच त्या केबिनमध्ये गेले होते. डॉक्टरांनी माझे डोळे तपासण्यास सुरुवात केली. परंतु, अचानकपणे त्यांनी इतर ठिकाणी स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणांचा आणि माझ्या डोळ्यांचा काहीही संबंध नव्हता. मी प्रचंड घाबरले होते. त्यावेळी मला स्वत:चाच तिरस्कार वाटायला लागला होता. अनेकदा घरी कोणी नसताना मी कोपऱ्यात बसून खूप रडायचे. आईला सांगायची सुद्धा हिंमत माझ्यात नव्हती. जर आईला सांगितलं तर ती माझीच चूक आहे असं म्हणेल", असं नीना यांनी आत्मचरित्रात लिहिलं आहे.पुढे त्या लिहितात, "डॉक्टरांप्रमाणेच टेलरचाही असाच वाईट अनुभव आला होता. इच्छा नसतानाही मला त्या टेलरकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. जर त्यावेळी टेलरकडे जायला मी नकार दिला  असता तर आईने मला कारण विचारलं असतं. या भीतीपोटी मी टेलरकडे गपगुमान जात राहिले."

दरम्यान, "सच कहूँ तो" या आत्मचरित्रात नीना गुप्ता यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. लग्न, मसाबा यांच्यावरही त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत. तसंच "अलिकडे लहान मुलांना चांगला आणि वाईट या दोन्ही स्पर्शांमधील फरक समजतो. पालकही मुलांना समजून घेतात. मात्र, आम्ही तरुण असतानाही याविषयी आमच्याशी कोणी चर्चा केली नव्हती", असं त्या म्हणतात. 

टॅग्स :नीना गुप्तासेलिब्रिटीसिनेमाविनयभंग