Join us  

जया बच्चन यांच्यावर भडकले 'शक्तिमान' मुकेश खन्ना, म्हणाले - ओरडू नका, शांत बसा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 1:39 PM

'शक्तिमान', भीष्म पितामह या भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनीही जया बच्चन यांच्यावर टीका केलीय आणि त्यांना शांत बसण्यास सांगितलंय.

बॉलिवूड  अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांनी रवि किशन यांचं नाव न घेता त्यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. आणि त्या म्हणाल्या होत्या की, ज्या ताटात खाल्लं, त्यातच छिद्र पाडलं. जया यांच्या या वक्तव्यामुळे इंडस्ट्री दोन भागात विभागली गेल्याचे बघायला मिळत आहे. काही लोक जया यांचं समर्थन करत आहेत तर काही लोक विरोध. अशात 'शक्तिमान', भीष्म पितामह या भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनीही जया बच्चन यांच्यावर टीका केलीय आणि त्यांना शांत बसण्यास सांगितलंय.

अभिनेते मुकेश खन्ना म्हणाले की, नियम तोडणाऱ्यांवर जनतेची नजर आहे. कुणीही इंडस्ट्रीला 'गटार' म्हणत नाहीये. केवळ तपासाची मागणी होत आहे. त्यामुळे जया बच्चन यांनी आरडाओरड करण्याऐवजी शांत बसावं आणि तपासाच्या आदेशाची वाट बघावी'.

एका मुलाखतीत मुकेश खन्ना म्हणाले की, 'कुणीतरी फारच चांगलं म्हटलंय की, बॉलिवूड गटार नाहीये. पण बॉलिवूडमध्ये जे गटार आहे, त्याने फरक पडतो. पूर्ण इंडस्ट्रीची निंदा कुणीही करत नाहीये. पण एक खराब मासा पूर्ण तलावाला खराब करू शकतो. अशात तुम्हाला जर त्या माशाचा शोध घ्यायचा असेल तर पूर्ण तलाव शोधावा लागेल. तेव्हा तुम्ही त्याला पकडू शकाल'.

'थाळीची चाळणी झाली आहे'

मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, 'प्रश्न तपासाचा आहे आणि जर कुणी म्हणत असेल की, ज्या ताटात जेवले, त्यातच छिद्र का करत आहात? तर मला सांगावं वाटेल की, इथे कुणीही थाळीचा विषय करत नाहीये. ही थाळी नाही चाळणी झाली आहे. आम्ही प्लेटबाबत बोलत नाही आहोत. पण त्यावर काय वाढलं जात आहे तो मुद्दा आहे'.

'तपासाची गरज, ओरडण्याची नाही'

मुकेश खन्ना हे जया बच्चन यांचं नाव घेत म्हणाले की, त्या सभागृहात इतका आरडाओरड का करत होत्या. आम्ही हे नाही म्हणत आहोत की, इंडस्ट्रीमध्ये सगळेच वाईट आहेत. आम्ही हे म्हणत आहोत की, काही वाईट आहेत आणि काही चांगले. आम्ही फक्त प्रश्न करतोय की, कोण वाईट आहे आणि कोण चांगलं? त्यासाठी आपल्याला एफबीआय, एनसीबीच्या तपासाची गरज आहे. तुम्ही विरोध का करत आहात? जर तुम्ही चांगल्या लोकांपैकी आहात तर बसा आणि आदेशाची वाट बघा. तुम्ही आरडाओरडा का करत आहात?

काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

रवी किशन यांच्या विधानानंतर जया बच्चन म्हणाल्या होत्या की, ' आमच्या एका खासदाराने लोकसभेत बॉलिवूडच्या विरोधात वक्तव्य केले. हे लाजीरवाणे आहे. मी कोणाचे नाव घेत नाही. तो स्वत: इंडस्ट्री मधून आला आहे. ज्या ताटात जेवायचं त्यालाच छिद्र पाडायचं ही एक चुकीची गोष्ट आहे. इंडस्ट्रीला सरकारच्या संरक्षण आणि पाठिंब्याची आवश्यकता आहे. बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केला होता.

हे पण वाचा :

बॉलिवूड अन् ड्रग्स प्रकरणात आता अभिनेत्री जया प्रदाची उडी; बच्चन कुटुंबीयांना दिलं थेट आव्हान

स्वरा भास्करने घेतली कंगना रणौतची शाळा, म्हणाली - मला शिव्या दे, हवं तर कुस्ती करू, पण...

"बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांच्या रोलसाठी हिरोसोबत शय्यासोबत करावी लागते" कंगनाचा सनसनाटी गौप्यस्फोट

टॅग्स :मुकेश खन्नाजया बच्चनबॉलिवूडअमली पदार्थ