परिवाराशी संबंधित सुत्रांनी माहिती दिली की, श्रीदेवीला कुठल्याही प्रकारचा हृदयाशी संबंधित त्रास नव्हता. त्यामुळे त्यांचे निधन आमच्यासाठी धक्कादायक आहे. वास्तविक श्रीदेवी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नेमहीच व्यायाम आणि योगा करण्यावर भर द्यायच्या. परंतु पुतण्याच्या लग्नासाठी परिवारासह दुबईला गेलेल्या श्रीदेवी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला अन् त्यांची प्राणज्योत मावळली.
दरम्यान, या लग्नसमारंभात श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर सहभागी झाली नव्हती. जान्हवी सध्या मुंबईमध्ये तिच्या ‘धडक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जेव्हा निर्माता करण जोहर याला श्रीदेवीच्या निधनाची बातमी समजली तेव्हा लगेचच करण जान्हवीला घेण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. जान्हवीला घेवून तोकाका अनिल कपूरकडे तिला घेऊन गेला. सध्या जान्हवी अनिल कपूरच्या घरी आहे.
जेव्हा रात्री उशिरा श्रीदेवीचे पार्थिव घरी आणले जाईल त्यानंतरच जान्हवीला त्याठिकाणी नेण्यात येईल. दरम्यान, रात्री ११ वाजेपर्यंत श्रीदेवीचे पार्थिव मुंबईत आणले जाण्याची शक्यता आहे. दुबईतील काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतरच श्रीदेवीचे पार्थिव मुंबईच्या दिशेने रवाना केले जाईल.