लता मंगेशकर यांच्याबाबत तुम्हाला माहीत नसलेल्या या १२ गोष्टी !
भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज (२८ सप्टेंबर) वाढदिवस. संगीतविश्वासतील अढळ ध्रृवतारा म्हणजे लता मंगेशकर. सहा दक्षकांपेक्षा अधिक काळ त्यांनी रसिकांच्या मनावर आपल्या सुमधुर आवाजाने अधिराज्य गाजवले आहे. संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिदीर्ची सुरुवात १९४२मध्ये झाली. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन केलं आहे. भारताचा सर्वोच्च मानला जाणारा 'भारतरत्न' पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. एवढेच नाही तर १९७४ ते १९९१च्या कालावधीत त्यांनी सर्वात जास्त गाणी गायली असल्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या 12 गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) लता मंगेशकरांच्या वडिलांचे निधन १९४२मध्ये हृदयविकाराने झाले. अवघ्या13व्या वर्षी त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. हेच कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी गायन आणि अभिनयाला सुरुवात केली.
२) वसंत जोगळेकरांच्या ‘किती हसाल’ (१९४२) या चित्रपटात त्यांनी ‘नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी....’ हे आयुष्यातले पहिले गाणे गायले मात्र ते गाण शेवटच्या क्षणी चित्रपटातून वगळण्यात आलं. त्याच दरम्यान त्यांनी 'पहिली मंगळागौर' चित्रपटात छोटीशी भूमिका केली. याच चित्रपटात त्यांनी ‘नटली चित्राची नवलाई....’ हे गाणे गायले होते.
३) लता दीदींनी शास्त्रीय संगीताचे धडे उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून घेतले, तर उस्ताद बडे गुलाम अली खानचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मा यांच्याकडूनदेखील त्या गाणे शिकल्या.
४) लता दीदी ‘मजबूर’ (१९४८) या चित्रपटातील ‘दिल मेरा तोडा.....’ या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आल्या तर १९४९मधील ‘महल’ चित्रपटातील मधुबालासाठी त्यांनी गायलेले ‘आयेगा आनेवाला....’ हे गाणे त्यांच्या करिअरमधील माइलस्टोन ठरले.
५) लता मंगेशकर यांची खरी ओळख हिंदी फिल्म इंडस्ट्रीला झाली ती 1950मध्ये. त्यावेळी त्यांची तुलना यशस्वी गायक एस.डी.बर्मन, नौशाद अली, सलील चौधरी आणि मदन मोहन यांच्याशी होऊ लागली.
६) लता दीदींना १९५८ मध्ये ‘मधुमती’ चित्रपटातील ‘आजा रे परदेसी...’ या गाण्यासाठी करिअरमधले पहिले फिल्मफेअर अॅवार्ड मिळाले.
७) १९५०मध्ये लता दीदी आणि एस.डी.बर्मन यांच्यात वाद झाल्याने दोघांनी एकत्र काम करणे बंद केले. त्यानंतर त्यांनी १९६२पर्यंत एकत्र काम केले नाही.
8) रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ' ऐ मेरे वतन के लोगों' हे देशभक्तिगीत ज्यावेळी दीदींना गायले ते ऐकून भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले.
९) लता दीदींनी ‘भूत बंगला’(१९६५) आणि ‘पती पत्नी’(१९६६) या आर.डी.बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटात गाणी गायिली. तसेच त्यांनी गायलेली ‘गाईड’ चित्रपटातील ‘आज फिर जीनेकी तमन्ना है....’, ‘गाता रहे मेरा दिल...’ आणि ‘ज्वेल थिफ’ मधील ‘होठों पे ऐसी बात....’ ही गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत.
१०) १९७०मधील ‘पाकिजा’ या मीना कुमारी यांच्या शेवटच्या चित्रपटातील ‘चलते चलते...’ आणि ‘इन्ही लोगो ने...’ या लता दीदींनी गायलेल्या गाण्यांना लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
११) १९७३च्या ‘परिचय’ या चित्रपटातील जया बच्चन आणि संजीव कुमार यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘बिती ना बिताई रैना...’ या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
१२) १९९०ला लता मंगेशकरांनी स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस स्थापन केले आणि त्याच वर्षी गुलजार दिग्दर्शित ‘लेकीन’ या चित्रपटाची निर्मिती केली. याच चित्रपटात लता दीदींनी ‘यारा सिली सिली....’ हे गाणे गायले आणि या गाण्यासाठी त्यांना तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे या गाण्याचे संगीत त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले होते.