Join us  

Birthday Special : वाचा, जावेद अख्तर यांच्या आयुष्यातील काही रंजक किस्से...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 10:41 AM

शायर, कवी, गीतकार असलेल्या याच  शब्दांच्या जादूगाराचा आज  आज (17 जानेवारी) वाढदिवस. आज जाणून घेऊ यात जावेद अख्तर यांच्या आयुष्यातील काही रंजक किस्से सोबत त्यांच्या काही यादगार रचना...

ठळक मुद्देशबानासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री हनी इराणी यांच्यासोबत जावेद यांचे लग्न झाले होते. हनी आणि जावेद यांचा प्रेमविवाह होता.

‘शब्दांचे जादूगार’ जावेद अख्तर या नावाला कुठल्याही परिचयाची गरज नाही. केवळ शब्दांच्या जोरावर जावेद यांनी बॉलिवूडमध्ये एक आगळी-वेगळी ओळख निर्माण केली. शायर, कवी, गीतकार असलेल्या याच  शब्दांच्या जादूगाराचा आज  आज (17 जानेवारी) वाढदिवस. आज जाणून घेऊ यात जावेद अख्तर यांच्या आयुष्यातील काही रंजक किस्से सोबत त्यांच्या काही यादगार रचना...

जावेद अख्तर यांना ‘शब्दांचे जादूगार’ म्हटले जाते. पण फार कमी लोकांना ठाऊक असेल की त्यांचे खरे नावही जादू असेच आहे. यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला होता.  त्यांचे  वडील जाँ निसार अख्तर एक प्रख्यात उर्दू शायर आणि गीतकार होते. त्यामुळे जावेद अख्तर यांना   कलेचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला. 

१९६४ मध्ये जावेद अख्तर मुंबईत आले आणि मुंबईचेच झाले. याच मुंबईने जावेद अख्तर यांना ऐश्वर्य,प्रसिद्धी, ओळख असे सगळे काही मिळवून दिले. जावेद यांचे वडिलांसोबतचे नाते फारसे चांगले नव्हते. त्यामुळे वडिल एक प्रसिद्ध गीतकार असूनही जावेद अख्तर यांनी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची ओळख बनविण्यासाठी वडिलांची मदत घेतली नाही आणि म्हणूनचं त्यांच्या यशाचा मार्ग अनेक संघर्षांनी भरलेला राहिला.  अगदी रस्त्यावर झाडाखाली त्यांनी अनेक दिवस काढलेत. त्यानंतर कमाल अमरोही यांच्या स्टुडिओमध्ये त्यांच्या राहण्याची सोय झाली.   

सलीम-जावेद या जोडीने अनेक अमर पटकथा लिहिल्या.  सलीम खान आणि जावेद अख्तर यांची पहिली ओळख एस. एम. सागर यांच्या ‘सरहदी लुटेरा’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी झाली होती. आश्चर्य वाटेल पण त्यावेळी सलीम खान या चित्रपटात अभिनय करत होते. तर, जावेद अख्तर ‘क्लॅपर बॉय’चे काम करत होते. एक दिवस चित्रपटाचे संवाद लेखक सेटवर  पोहोचले नाहीत आणि अचानक  दिग्दर्शकाने ‘क्लॅपर बॉय’चे काम करणाºया जावेद अख्तर यांना चित्रपटातील संवाद लिहिण्यास सांगितले. एस. एम. सागर यांना जावेद अख्तर यांचे संवाद इतके  आवडले की चित्रपटाच्या संवाद लेखनाची पुढची जबाबदारी थेट जावेद अख्तर यांच्यावर येऊन पडली. याच चित्रपटाच्या सेटवर जावेद अख्तर आणि सलीम खान यांची ओळख झाली. आणि बघता बघता सलीम- जावेद ही जोडी नावारुपास आली. या जोडीने आजवर २४ सुपरहिट सिनेमे दिलेत. जंजिर , दीवार ,  डॉन , सीता और गीता ,  शोले ,  मिस्टर इंडिया असे अनेक चित्रपट या यादीत आहेत.दोघांनी १९८७ पर्यंत एकत्र काम केले. पण नंतर दोघांमध्ये मतभेद झाले आणि ही जोडी तुटली. मिस्टर इंडिया या जोडीचा शेवटचा चित्रपट होता.

शबानासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री हनी इराणी यांच्यासोबत जावेद यांचे लग्न झाले होते. हनी आणि जावेद यांचा प्रेमविवाह होता. ‘सीता और गीता’ या चित्रपटाच्या सेटवर हनी आणि जावेद यांची ओळख झाली होती. काहीच दिवसांत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

पुढे जावेद यांच्या आयुष्यात शबाना आझमी आल्यात. शबाना आणि जावेद यांची ओळख झाली, त्यावेळी त्यांचे हनी यांच्यासोबत लग्न झाले होते. जावेद यांचे लग्न झाले असल्यामुळे शबाना त्यांच्यापासून दूरच राहायची. पण एका पार्टीत शबानाच्या ‘स्पर्श’ या चित्रपटातील भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आणि त्या दिवसापासून त्यांच्यात संभाषणाला सुरुवात झाली. काहीच काळात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. हनी यांच्या कानावर ही गोष्ट पोहोचताच घरात रोज भांडणे व्हायला लागली. पण जावेद आता आपल्यावर प्रेम करत नाहीत याची हनी यांना जाणीव झाल्याने त्यांनी जावेद यांना शबानाकडे जायला सांगितले. लग्नाच्या सातच वर्षांत हनी आणि जावेद यांनी घटस्फोट घेतला. हनीसोबत घटस्फोट झाल्यानंतर वर्षभरातच जावेद आणि शबाना यांनी लग्न केले. 

टॅग्स :जावेद अख्तरशबाना आझमी