Join us

'३ इडियट्स'मध्ये करीना कपूरच्या जागी दिसली असती अनुष्का शर्मा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:09 IST

3 Idiots Movie : राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'थ्री इडियट्स' हा २००९ सालचा सुपरहिट चित्रपट ठरला. फार कमी लोकांना माहिती आहे की करीना कपूरच्या आधी अनुष्का शर्माने या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते.

राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'थ्री इडियट्स' (3 Idiots Movie) हा २००९ सालचा सुपरहिट चित्रपट ठरला. या चित्रपटाने ४ वर्षे २०० कोटी कमाईचा विक्रम कायम ठेवला होता. या चित्रपटाची कथा यशाच्या मागे धावू नका, क्षमतेच्या मागे धावा या संदेशावर आधारित होती. या चित्रपटातील खास संदेश प्रेक्षकांना खूप भावला होता. पण फार कमी लोकांना माहिती आहे की करीना कपूर(Kareena  Kapoor)च्या आधी अनुष्का शर्मा(Anushka Sharma)ने या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते.

आमिर खान आणि करीना कपूर यांच्या 'थ्री इडियट्स' या चित्रपटाने बॉलिवूड तसेच हॉलिवूडमधील सर्व मोठ्या चित्रपटांना मागे टाकले. या चित्रपटातील गाणी देखील लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली. चित्रपटात विद्यार्थ्यांचे जीवन देखील खूप सुंदरपणे रेखाटण्यात आले. चित्रपटातील आमिर आणि करीनाची केमिस्ट्री देखील लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झाली पण अनुष्का शर्माने या चित्रपटासाठी आधी ऑडिशन दिले होते. जर अनुष्काला हा चित्रपट मिळाला असता तर हा तिच्या कारकिर्दीतील दुसरा चित्रपट असता जो ब्लॉकबस्टर ठरला असता. पण करीना कपूरला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 

'३ इडियट्स'साठी अनुष्कानं दिलेलं ऑडिशन

अनुष्का शर्माने तिच्या कारकिर्दीची सुरुवात शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' (२००८) या चित्रपटातून केली. पण जर तिची ३ इडियट्स सिनेमात निवड झाली असती तर ती तिच्या पहिल्या चित्रपटात आमिर खानची नायिका झाली असती. तिचे पहिले दिग्दर्शक राजकुमार हिराणी झाले असते. रंजक बाब ही आहे की हिराणीने तिला '३ इडियट्स'मधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र नंतर अनुष्का हिराणींच्या 'पीके' (२०१४) आणि 'संजू' (२०१८) या दोन चित्रपटांमध्ये दिसली. यशानंतर, अनुष्का तिच्या स्ट्रगलबद्दल सांगण्यास मागेपुढे पाहत नाही. ती सांगते की आदित्य चोप्राच्या 'रब ने बना दी जोडी' मध्ये काम करण्यापूर्वी तिने काही चित्रपटांसाठी ऑडिशन्स दिले होते. यामध्ये '३ इडियट्स'चाही समावेश होता.

'३ इडियट्स'मध्ये लागली बेबोची वर्णी

'३ इडियट्स' चित्रपटासाठी इतर काही मुलींनीही ऑडिशन दिले होते. नंतर ही भूमिका करीना कपूरकडे गेली. अनुष्का म्हणते की या चित्रपटात निवड न झाल्यानंतर तिने आत्मविश्वास गमावला नाही. ती ऑडिशन देत राहिली आणि काही दिवसांनी तिला 'रब ने बना दी जोडी'साठी फोन आला. यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले.

टॅग्स :अनुष्का शर्माकरिना कपूरराजकुमार हिरानीआमिर खान