Join us  

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदी घालण्याची मागणी, वाचा काय आहे नवं प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 11:37 AM

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise ) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा नव्याने वादात सापडला आहे.

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise ) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. अर्थात अद्यापही सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. सोशल मीडियावर ‘पुष्पा’ची जोरदार चर्चा आहे. चित्रपटातील गाण्यांचे रील्स, त्यातले डायलॉग्स व्हायरत होत आहेत. अशात आता हा सिनेमा नव्याने वादात सापडला आहे.होय,  शिवार फाऊंडेशनचे संस्थापक सुभाष साळवे यांनी चित्रपटावर बंदी घाला, अशी मागणी करत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  यांना पत्र लिहिलं आहे. 

‘पुष्पा’ या चित्रपटात पोलीस वर्दीचा वापर करून जनतेचा पोलीस प्रशासनवरील विश्वास उठेल असं दृश्य दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस बांधवांना आणि पोलीस समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशी तक्रार त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

चित्रपट निर्माता व चित्रपटाचा अभिनेता यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे आणि चित्रपटावर बंदी घालण्यात यावी. यापुढे असं चित्रीकरण होत असेल तर ते आधीच थांबवलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्र गृहमंत्र्यांनी पाऊल उचलावं, जेणेकरून कुठलाही अभिनेता व निर्माता पोलीस प्रशासन, खाकीचा अवमान करण्याच हिंमत करणार नाही, असं सुभाष साळवे यांनी गृहमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

‘पुष्पा’ हा सिनेमा गत 17 डिसेंबरला रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. कोरोना काळात सुद्धा या चित्रपटाला पे्रक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार करत बक्कळ कमाई केली आहे. तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे.

चित्रपटातील सामंथा रुथ प्रभूच्या  आयटम साँगचीही जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.  

टॅग्स :अल्लू अर्जुनदिलीप वळसे पाटील