द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी देखील आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. यंदाच्या आठवड्यात या कार्यक्रमात आयुषमान खुराणा, ईशा तलवार, मनोज पावा आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा आर्टिकल 15 या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत.
‘मुल्क’ या सामाजिक विषयावरील चित्रपटाला यश मिळाल्यानंतर अनुभव सिन्हा आणि मनोज पावा पुन्हा एकदा ‘आर्टिकल 15’ या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. हा एक सामाजिक-राजकीय नाट्य असलेला चित्रपट असून या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. आयुषमान खुरानाने एका पाठोपाठ एक चार सुपरहिट चित्रपट दिल्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये त्याचा बोलबाला आहे. आयुषमान जेव्हा पडद्यावर येतो, तेव्हा प्रत्येक वेळी काही तरी आगळे वेगळे घेऊन येतो याची खात्री आता त्याच्या फॅन्सना असते. त्याचे सगळेच चित्रपट अत्यंत नव्या आशयाचे असतात. त्यामुळे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडून त्याचे प्रचंड कौतुक केले जाते. पण आयुषमानचे चित्रपट पाहायला त्याच्या मुलाला परवानगी नाहीये. त्यानेच ही गोष्ट कपिल शर्माच्या कार्यक्रमात सांगितली.
चित्रपटांच्या निवडीबद्दल बोलताना कपिल शर्माने आयुषमानला विचारले की, जेव्हा त्याचा मुलगा तुझे चित्रपट पाहतो, तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असते? यावर आयुषमानने सांगितले की, “मी माझ्या सात वर्षाच्या मुलाला माझे चित्रपट दाखवण्याचे टाळतो. मी जर विकी डोनर, शुभ मंगल सावधान आणि बधाई हो सारखे माझे चित्रपट त्याला दाखवले, तर त्याचे कुतूहल वाढेल आणि चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल तो मला असंख्य प्रश्न विचारेल, ज्याची उत्तरे मला त्याला आता देता येणार नाहीत. त्याला थोडे मोठे होऊ देत आणि मगच हे चित्रपट बघू देत असे माझे म्हणणे आहे आणि तसे ही त्याला अभिनेता म्हणून मी नव्हे तर वरुण धवन आवडतो आणि तेच बरे आहे असे मला वाटते.”
या कार्यक्रमात पुढे आयुषमानने सांगितले की, मी आर्टिकल 15 या चित्रपटासाठी मनोज मालवीय या माझ्या आयपीएस अधिकारी असलेल्या मित्राची मदत घेतली. मी त्याच्या देहबोलीचा अभ्यास केला. दिनचर्या आणि इतर बारीकसारिक तपाशिलांबद्दल जाणून घेतले. मी बॉलीवूड अभिनेत्यांना एक विनंती करू इच्छितो की, आर्थिक लाभ न पाहता एकंदर समाजाचा विचार करून सामाजिक संदेश देणारे चित्रपट करावेत.