दोन तपांहून अधिक काळ रखडलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या बहुचर्चित धामणी मध्यम प्रकल्पात सध्या प्रथमच पाणी साठवण सुरू असून प्रकल्पात आजअखेर सुमारे सव्वा टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे.
त्यामुळे या प्रकल्पाने पूर्णत्वाचे यशोशिखर गाठले असून, प्रकाश आबिटकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, पाटबंधारे विभागाचे नियोजनबद्ध व गतिशील कामकाज आणि जनतेच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे धामणी खोऱ्यात हरितक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे.
३.८५ टीएमसी क्षमतेच्या आणि चौदाशे हेक्टर भीजक्षेत्र असणाऱ्या धामणी प्रकल्पाला जनतेच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे सन १९९६ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली मात्र काम सुरू होण्यास २००० साल उजाडले.
गतवर्षी, यावर्षी घळभरणीस सुरुवात न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घळभरणीचा पारंभ होऊन गेले सात-आठ महिने संबंधित विभागाने नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण काम करून सध्या या प्रकल्पात एक टीएमसीवर पाणी साठवणूक केली आहे.
दोन हजार क्युसेकने विसर्ग
• गेल्या काही दिवसांपासून धामणी खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धामणी मध्यम प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील सव्वा टीएमसी पाणी जमा झाले असून २००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू झाला आहे.
• यावर्षी प्रथमच या प्रकल्पाची पहिल्या टप्प्यातील घळभरणी पूर्ण झाली असून ३.८५ क्षमतेच्या या प्रकल्पात पहिल्या वर्षी सव्वा टीएमसी पाणी साठवण करण्याचे नियोजन होते. त्याप्रमाणे हा प्रकल्प भरला आहे.
• सध्या सिंचन विमोचकामधून १६१७.३९ क्युसेक पाणी, तर वळण कालव्यामधून ३३५.५५ क्युसेक असा विसर्ग सुरू आहे.