राज्यात उद्यापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. ऐन हिवाळ्यात अवकाळीची शक्यता वर्तवल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिण अंदमान समुद्र व परिसरात असल्याने कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश व दक्षिण राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्यापासून (दि २३) राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उद्या कोकणातील सिधुदूर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहणार आहे.
पावसाचा जोर वाढणार
- राज्यात बहूतांश भागात २४ तारखेपासून पावसाचा जोर वाढणार असून उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विभागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- २४ नोव्हेंबर रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग मध्य महाराष्ट्रातील पूणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठाड्यात लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
२५ व २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- मुंबई, ठाणे पालघरसह कोकणातील रायगड, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
- पुणे,अहमदनगर,नंदूरबार,धूळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून वातावरण ढगाळ राहणार आहे.
- कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव व जालना जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.