Join us

राणी व्हिक्टोरियांनी बांधलेला हा तलाव मे महिन्यातच झाला ओव्हरफ्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:50 IST

Rajewadi Talav ऐन उन्हाळ्यात बिगर मौसमी पडलेल्या धुवाधार पावसामुळे राजेवाडी (म्हसवड) तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून धो.. धो... पाणी वाहू लागल्यामुळे माण नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

सांगोला : ऐन उन्हाळ्यात बिगर मौसमी पडलेल्या धुवाधार पावसामुळे राजेवाडी (म्हसवड) तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून धो.. धो... पाणी वाहू लागल्यामुळे माण नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

राजेवाडी तलावाच्या निर्मितीनंतर इतिहासात निसर्गाच्या किमयेमुळे ऐन उन्हाळ्यात तलाव १०० टक्के भरण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

राजेवाडी तलाव भरल्यामुळे सांगोला व आटपाडी तालुक्यातील लाभधारक शेतकरी वर्गातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कालवा क्रमांक-२ मधून सांगोला तालुक्यातील खवासपूर, कटफळ, शेरेवाडी, आचकदाणी, लक्ष्मीनगर, चिकमहूद, जाधववाडी, नरळेवाडी, वाकी शिवणे या गावातील सुमारे १० हजार ४४९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येतात.

सध्या टेंभू योजनेतून माण नदीत ४०० क्युसेसने पाणी सोडले असून, वाढेगाव बंधाऱ्यापर्यंत पोहोचले आहे. राजेवाडी तलाव भरल्यामुळे सांडव्यावरून वाहणारे पाणी माण नदीत पात्रात दाखल झाल्यामुळे मान नदीला पुराचे स्वरूप आले आहे.

राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह माण नदीतून सांगोला तालुक्यातून पुढे पंढरपूर चंद्रभागेला जाऊन नदी मिळते, असे माणगंगा भ्रमण सेवा बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैजनाथ घोंगडे यांनी सांगितले.

राणी व्हिक्टोरियांनी बांधला होता तलावसातारा व सांगली जिल्ह्यांच्या सरहद्दीवर राणी व्हिक्टोरिया यांनी ब्रिटिशकालीन तीन टी.एम.सी. साठवण क्षमतेचा राजेवाडी या ठिकाणी तलाव बांधला आहे. तलाव जरी सांगली जिल्ह्याच्या हद्दीत असला तरी पाणलोट क्षेत्र सातारा (दहिवडी) तालुक्यातील कुळकजाई येथे माण नदीचा उगमस्थान आहे.

राजेवाडी लावात सुमारे १.७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला असून, पिकांना उपयुक्त ठरणार आहे. - अभिजित नवले, शाखा अभियंता 

अधिक वाचा: पुढील पाच ते सहा दिवस पावसाचा जोर ओसरणार; पेरणी करावी का?

टॅग्स :पाणीपाऊसधरणशेतकरीशेतीटेंभू धरण