राजूरः निळवंडे लाभक्षेत्रासाठी रविवारी सकाळी अकरा वाजता धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले. सोडण्यात आलेले हे उन्हाळी आवर्तन एक महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू राहणार आहे.
रविवारी सकाळी भंडारदरा धरणातून वीजनिर्मिती केंद्रातून ८५० तर धरणाच्या मोरीतून ५०५ क्युसेक असा एकूण १ हजार ३५५ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू होता. सकाळी भंडारदरा धरणाचा पाणी साठा ५ हजार ९२२ दलघफू होता.
निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यातून सकाळी अकरा वाजता विसर्ग सुरू करण्यात आला. सायंकाळी यात डाव्या कालव्यातून २५० तर उजव्या कालव्यातून २०० असे एकूण ४५० क्युसेक पाणी कालव्यात सोडण्यात येत होते.
आवर्तन सोडते वेळी निळवंडे धरणाचा पाणी साठा २ हजार ६७८ दलघफू होता. निळवंडे व भंडारदरा धरणांच्या लाभक्षेत्रासाठी या पूर्वीच प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे.
रविवारी निळवंडे धरणातून वीजनिर्मितीसाठी ८०० क्युसेक तर विमोचकामधून ७०० असे एकूण १ हजार ५०० क्युसेक पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत होते.
या बरोबरच निळवंडेच्या उच्चस्तरीय कालव्यातूनही विसर्ग सुरू आहे. यामुळे निळवंडे धरणातून रविवारी सायंकाळी नदी पात्र आणि कालते मिळून १ हजार ९५१.५० क्युसेक पाणी सोडण्यात येत होते.
अंब्रेलाचे सौंदर्य खुललेनिळवंडे धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी भंडारदरा धरणातून शुक्रवारी सोडण्यात येत असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली. यावेळी या धरणाच्या सर्वात उंच असणाऱ्या २०० फूट उंचीवरील मोरीतून ५०५ क्युसेकने पाणी सोडल्यामुळे भर उन्हाळ्यात येथील सौंदर्याचा मानबिंदू असलेला अंब्रेला फॉल कोसळू लागला आहे.
अधिक वाचा: Pik Vima : विमा कंपन्यांसाठी शासनाचे नवे निकष; आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा