Join us
Daily Top 2Weekly Top 5

शनिदेवगाव प्रकल्पाचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून 'एमडब्ल्यूआरआर'कडे प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 09:25 IST

वैजापूर आणि श्रीरामपूर या तालुक्यांतील १६ गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रस्तावित शनिदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्याचा प्रस्ताव ६ महिन्यांपासून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन (एमडब्ल्यूआरआर) कडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे.

बापू सोळुंके 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर या तालुक्यांतील १६ गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रस्तावित शनिदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्याचा प्रस्ताव ६ महिन्यांपासून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन (एमडब्ल्यूआरआर) कडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सुमारे १ हजार ९८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

गोदावरी नदीवरील अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे खानापूर बंधारा आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील कमलापूर बंधारा होता. हे दोन्ही बंधारे सन १९७२ आणि १९७६ मध्ये बांधण्यात आले होते. दोन्ही  बंधारे नादुरुस्त झाल्याने जलसंपदा विभागाने शनिदेवगाव येथे उच्च पातळी बंधारा बांधण्याचा प्रस्ताव दिला होता.

१६ सप्टेंबर २०२३ ला संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी होती. वैजापूरातील ८, श्रीरामपूरमधील ८ असे १६ गावांतील १ हजार ९८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी २८५ कोटी खर्च प्रस्तावित केला आहे.

२०२५ मध्ये अंतिम प्रारूप मंजूर

प्रस्ताव मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविला होता. त्यांनी गतवर्षी तो मंजूर केला होता. यानंतर मंजुरीसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमनकडे सहा महिन्यांपूर्वी सादर केला आहे. अद्याप 'एमडब्ल्यूआरआर' ने निर्णय घेतला नाही. जोपर्यंत एमडब्ल्यूआरआरकडून मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत निविदा प्रक्रिया राबविता येणार नाही.

शनिदेवगाव उच्च पातळी बंधाऱ्याचा प्रस्ताव राज्यपाल आणि एमडब्ल्यूआरआरकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. राज्यपालांनी गतवर्षी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता एमडब्ल्यूआरआरने मंजुरी द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. - उमेश वानखेडे, कार्यकारी अभियंता, छत्रपती संभाजीनगर पाटबंधारे विभाग.

८.८४ दलघमी पाणी जमा होणार

जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागात नवीन प्रकल्प उभारण्यात येऊ नये, असा निर्णय शासनाने घेतला आहे. हा नवीन प्रकल्प जुन्या नादुरुस्त कमलापूर आणि खानापूर कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या बदल्यात प्रस्तावित आहे. या दोन्ही बंधाऱ्यांत जमा होणारे एकूण ८.८४ दलघमी पाणी शनिदेवगाव बंधाऱ्यात घेतले जाणार आहे.

हेही वाचा : परिस्थितीशी झुंज देत विजयालक्ष्मी यांची दुग्धव्यवसायात भरारी; आता महिन्याकाठी १ लाख रुपयांची कमाई

टॅग्स :पाणीधरणनदीशेती क्षेत्रगोदावरीअहिल्यानगरछत्रपती संभाजीनगरसरकार