Join us

राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढला; पश्चिम महाराष्ट्रासह नाशिक, विदर्भ अन् मराठवाड्यात आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 10:45 IST

राज्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकला पावसाचे पुन्हा आगमन झाले असून संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाला आहे.

राज्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकला पावसाचे पुन्हा आगमन झाले असून संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाला आहे.

विदर्भात सर्वदूर पाऊस असून सर्व जिल्हे सरासरीच्या पुढे गेले आहेत. नागपूरसह गडचिरोलीत चौथ्या दिवशीही रिपरिप सुरूच होती. पर्ल कोटाचा नदीचा पूर ओसरला असला तरी चार मार्ग बंदच होते. भंडारा, गोंदियात संततधार असून तीन तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

भंडारा जिल्ह्यातील १७ मार्ग बंद, पुजारीटोला, कालीसरार धरणाचे दरवाजे उघडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे, सात महसूल मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अमरावती जिल्ह्यातही दोन मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

वर्धा जिल्ह्यात संततधार पावसामुळे निम्न वर्धा प्रकल्पाचे ५ दरवाजे प्रत्येकी ३० सेंटिमीटरने उघडण्यात आले. आर्वी तालुक्यातील उमरी व दहेगाव गोंडी प्रकल्प १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून ओव्हरफ्लो सुरू आहे.

संततधार पावसाने मराठवाडा चिंब

• नांदेड जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असून अनेक प्रकल्प भरले आहेत. परभणी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर होता. पुणे जिल्ह्यातील दौंड व बंडगार्डन येथून विसर्ग वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण ९५ टक्के भरले असून धरणातून विसर्ग सुरू आहे.

• मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपल्याने शेतातील उभी पिके पाण्यात गेली आहेत.

महाबळेश्वरला २२६ मिमी. पाऊस

कोल्हापूर, सांगलीला पावसाचा रात्रभर तडाखा असून धरणांची पाणी पातळी वाढली आहे. साताऱ्यात नवजाला १८८ तर महाबळेश्वरला २२६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : गाजरगवताची ॲलर्जी झाल्यास काय कराल? कशी घ्याल काळजी; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :पाऊसमहाराष्ट्रविदर्भशेती क्षेत्रमराठवाडा