कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील शाळी नदीच्या उगमस्थानावर असलेले पालेश्वर धरण जून महिन्यातच 'ओव्हर फ्लो' झाले आहे. त्यामुळे वीस गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. येथे जवळच असलेला धरणांचा धबधबा ओसंडून वाहत आहे. धरणावर वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
दरवर्षीप्रमाणे धरणाच्या परिसरात जास्त प्रमाणात पाऊस पडत असले तरी यावेळी धरण पंधरा दिवस अगोदर भरले आहे. धरणांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग शाळी नदीत होत आहे. सांडव्याच्या बाजूला धबधबा निर्माण झाल्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
शाहुवाडी तालुक्यात गेल्या चौवीस तासात पावसाचा जोर वाढला असून शाळी, कडवी नदीच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. धरण भरल्यामुळे वीस गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा पाणी प्रश्न निकाली निघाला आहे.
भात लावणीची लगबग उडाली आहे. धरण क्षेत्रात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. धरणावर शाहूवाडी पोलिसांनी बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.