Vidarbha Weather Update : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसांचा पावसाचा इशारा नसल्याने दिलासा मिळाला आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांत पिकांना उभारी मिळण्याची संधी मिळणार आहे. (Vidarbha Weather Update)
हवामानातील अनिश्चितता कायम असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या महिनाभर सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्रस्त झालेल्या पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना अखेर दोन दिवसांचा दिलासा मिळणार आहे. (Vidarbha Weather Update)
प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यांसाठी येत्या दोन दिवसात पावसाचा कोणताही इशारा नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Vidarbha Weather Update)
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अंदाज
पावसामुळे उभी पिके, फळबागा तसेच कापूस, सोयाबीन यांसारख्या हंगामी पिकांना धोका निर्माण झाला होता. अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ खुंटली, रोगराई पसरली आणि उत्पादन धोक्यात आले होते.
त्यामुळे हवामान विभागाकडून मिळालेली पावसाच्या विश्रांतीची शक्यता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.
सतर्क राहणे गरजेचे
कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, हवामानातील अनिश्चिततेकडे दुर्लक्ष करू नये. पिकांवरील कीड आणि रोगराईचा धोका लक्षात घेता वेळोवेळी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे.
पावसामुळे झालेले नुकसान
गेल्या महिन्यातील सततच्या पावसाने ३५ जणांचा मृत्यू तर २६ जण जखमी झाले.
४.३० लाख हेक्टर पिकांचे नुकसान नोंदले गेले आहे.
नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे ६ हजार हेक्टर शेती खरडून गेली आहे.
मृत्यूंच्या आकडेवारीत बुलडाणा जिल्हा सर्वाधिक प्रभावित असून तेथे १३, अमरावतीत ९, वाशिममध्ये ६, यवतमाळमध्ये ५ आणि अकोला जिल्ह्यात २ व्यक्तींचा मृत्यू झाला.
यापैकी १९ व्यक्ती नदी-नाल्याच्या पुरात वाहून गेल्या आहेत.
नागपूरमध्ये हवामानाचा खेळ
नागपूर शहरात मंगळवारी हवामानाने क्षणोक्षणी रंग बदलला. सकाळी कडक उन्हामुळे तापमान ३४ अंश सेल्सियसवर पोहोचले. दुपारी ढगांची दाटी वाढली आणि सायंकाळी अनेक भागांत जोरदार सरी कोसळल्या. सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात २ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामानाचा पट्टा बदलतोय
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानपासून गुजरातपर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण व नैऋत्येकडे सरकत कमकुवत होत आहे.
पुढील २४ तासांत हा पट्टा आणखी कमजोर होईल असा अंदाज आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्याचा परिणाम पुढील काही दिवसांत हवामानावर दिसू शकतो.