जळगाव : तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हतनूर धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने धरणाचे ४१ पैकी ३० दरवाजे उघडून तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
त्यापैकी २४ दरवाजे पूर्ण क्षमतेने तर ६ दरवाजे १.० मीटरने उघडण्यात आले असून, धरणातून तब्बल ४,५४८ क्यूसेक (१,६०,६१३ क्यूसेक) इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. त्यामुळे शेळगाव धरणाचेही १८ दरवाजे उघडण्यात आले आहे.
धरण परिसरात सतत पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठा वाढला आहे. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता धरणातील पाणीपातळी २११.२५० मीटर इतकी झाली असून, धरणाची पूर्ण क्षमतेची पातळी २१४,००० मीटर आहे. धरणात एकूण साठा २४६.०० दशलक्ष घनमीटर (६३.४० टक्के) तर उपयोगी साठा ११३.०० दशलक्ष घनमीटर (४४.३१ टक्के) आहे.
पाणलोट क्षेत्रातील या पावसामुळे धरणातील साठा वेगाने वाढत असून, विसर्गही वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. धरणातून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील विसर्गामुळे तापी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
पाणलोट क्षेत्रातील पाऊसधरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत तब्बल ४२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये टेक्सा येथे सर्वाधिक १२४.४ मि.मी., देढतलाई येथे २२.६ मि.मी., लखपुरी येथे ५२.० मि.मी., गोपालखेडा येथे ४९.४ मि.मी. नोंद झाली आहे. कालव्यातून २.८३ क्यूसेक्स (१०० क्यूसेक) पाणी सोडण्यात आले असून, आरएस गेटद्वारे कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. धरण परिसरात मागील २४ तासांत ७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंतचा एकूण पाऊस ३५४ मि.मी. झाला आहे.