Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीनंतर अवघ्या एका महिन्यात पुन्हा मुसळधार पावसाने विभागाला झोडपले. (Marathwada Heavy Rain)
२८ ऑक्टोबरच्या रात्रीतून मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील ४० महसूल मंडळांत १२०० गावांवर मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. (Marathwada Heavy Rain)
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि 'मोंथा' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामानात मोठा बदल होऊन हा अवकाळी पाऊस झाला आहे. (Marathwada Heavy Rain)
१३३ टक्के पावसाची नोंद
जूनपासून आजवर मराठवाड्यात सरासरीच्या १३३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ६७९ मि.मी.च्या तुलनेत तब्बल १,०२९ मि.मी. पाऊस विभागात झाला आहे. यात ३५० मि.मी. अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला असून, यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे.
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक फटका
लातूर जिल्ह्यात तब्बल २७ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. रेणापूर, देवणी, निलंगा आणि उदगीर तालुक्यांत पावसाने कहर केला.
रेणापूर तालुक्यातील रेणा नदीला पूर आला असून, अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या आहेत.
मांजरा, तेरणा, रेणा आणि तावरजा नद्यांना पूर आला आहे.
आणि लोदगा जवळील बिंदगीहाळ शिवारात मांजरा नदीच्या पुरात अडकलेले तिघे शेतकरी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान आणि टाहो
रेणापूर तालुक्यातील गरसुळी येथील शेतकरी सूरज चव्हाण यांचे ५ बॅग सोयाबीन पिकाचे संपूर्ण नुकसान झाले. काढणी केलेल्या सोयाबीनच्या गंजीही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांनी हताश होऊन टाहो फोडला. या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाची सुरुवात लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसाची आकडेवारी
छत्रपती संभाजीनगर: २२ मि.मी.
जालना: २८ मि.मी.
बीड: २८ मि.मी.
परभणी: २६ मि.मी.
लातूर: सर्वाधिक ६२.२ मि.मी.
हिंगोली: ४ मि.मी.
धाराशिव: ८ मि.मी.
एकूण २४.८ मि.मी.
पावसाची नोंद विभागात झाली असून, ७ मंडळांत १०० ते १६० मि.मी.दरम्यान पाऊस झाला आहे.
प्रमुख अतिवृष्टी झालेली मंडळे (लातूर जिल्हा)
रेणापूर – १५७.३ मि.मी.
पोहरेगाव – १५७.८ मि.मी.
बोरोळ – १६३ मि.मी.
देवणी – १०८.८ मि.मी.
पळशी – ११८.८ मि.मी.
पानगाव – १२८.३ मि.मी.
उदगीर – ७५.५ मि.मी.
निलंगा – ७२.५ मि.मी.
नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला
मांजरा नदीवरील औराद वांजरखेडा, तुगाव, हालसी या पुलांवरून पाणी वाहत असल्याने नदीपलीकडील १० गावांचा औराद बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून, नागरिकांना नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दोन महिन्यांतील अतिवृष्टीचा आढावा
सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांत मराठवाड्यात ७६५ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. सप्टेंबरमधील १८९ मंडळांनंतर आता ऑक्टोबरमध्ये ४० नवीन मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
एकूण जिल्हानिहाय अतिवृष्टी
| जिल्हा | अतिवृष्टी झालेली मंडळे |
|---|---|
| छत्रपती संभाजीनगर | ७ |
| जालना | २ |
| बीड | २ |
| लातूर | २७ |
| परभणी | २ |
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये जलसंपदा व महसूल विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीकाठच्या गावांतून नागरिकांचे स्थलांतर केले जाऊ शकते.
