Marathwada Dam Water Storage : मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे, मध्यम आणि लघुप्रकल्प झपाट्याने भरू लागले आहेत. प्रमुख प्रकल्पांत ९० टक्क्यांहून अधिक जलसाठा झाला असून, अनेक धरणे सांडव्यातून पाणी सोडू लागली आहेत.(Marathwada Dam Water Storage)
प्रमुख धरणांचा जलसाठा वाढला
सिद्धेश्वर प्रकल्प : ९२%
येलदरी प्रकल्प : ९९.५४%
निम्न दुधना : ७३.१७%
मांजरा प्रकल्प : ९४.२४%
निम्न तेरणा : ९६%
इसापूर प्रकल्प : १००%
माजलगाव : ५०%
विष्णुपुरी : ६३%
सीना कोळेगाव : ८८%
मराठवाड्यातील १५ उच्च पातळीच्या बंधाऱ्यांपैकी नऊ बंधाऱ्यांत ९०% वर साठा झाला आहे. उर्वरित बंधाऱ्यांत ६० ते ८०% पाणी साचले आहे.
लघु व मध्यम प्रकल्प तुडुंब
मराठवाड्यात ७५१ लघुप्रकल्प आहेत. मागील दोन दिवसांत ८७ मंडळांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
धुवाधार पावसामुळे ७५ मध्यम प्रकल्पांतही जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चार दिवसांपूर्वी या प्रकल्पांत सरासरी ४८% पाणीसाठा होता, तो वाढून आता ५१% वर पोहोचला आहे. काही प्रकल्प शंभर टक्के भरल्याने सांडवे ओसंडून वाहू लागले आहेत.
जायकवाडी धरण ९५% क्षमतेवर
राज्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली असून सोमवारी रात्री ९ वाजता जलसाठा ९५% वर पोहोचला.
सध्याची पाणीपातळी : १५२१.०४ फूट
एकूण पाणीसाठा : २७९४.४०६ दलघमी
जिवंत साठा : २०५६.३ दलघमी
आवक : ५,५३८ क्युसेक
१ जूनपासून आजपर्यंत धरणात ५७.७९ टीएमसी पाणी जमा झाले आहे. दरम्यान, दोन टीएमसी पाणी आधीच गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे. धरण ९८% क्षमतेवर आल्यानंतर नांदेड व परिसरातील पूरस्थिती लक्षात घेऊन नियोजित विसर्ग केला जाणार असल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती
सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील गोदावरी व उपनद्यांमध्ये पाणीपातळी वाढली असून गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे धरणे व प्रकल्प भरले असून, पाण्याचा पुरवठा व सिंचनाच्या दृष्टीने हा दिलासादायक काळ मानला जात आहे. मात्र, काही ठिकाणी पूरस्थितीमुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Jayakawadi Dam Water : जायकवाडी भरले; १.८ लाख हेक्टर शेतीला दिलासा वाचा सविस्तर