Join us

Marathawada Rain Alert: मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; नागरिकांंना सतर्कतेच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 09:28 IST

Marathawada Rain Alert: मराठवाड्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. ६५ महसुली मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणांचे दरवाजे उघडल्याने गावं व शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Marathawada Rain Alert)

Marathawada Rain Alert: मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून (१५ व १६ ऑगस्ट) मुसळधार पावसाचा जोर कायम असून, आठही जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले, अनेक गावांचा संपर्क तुटला, तर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Marathawada Rain Alert)

आतापर्यंत ६५ महसुली मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे.(Marathawada Rain Alert)

छत्रपती संभाजीनगर जिल्हात गारज मंडळात तब्बल १२६.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. वरूड काझी, पिसादेवी, हर्सुल सावंगी आणि चौका तसेच वैजापूर तालुक्यातील गारज व लोणी येथे ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या-नाले ओसंडून वाहिले. अनेक शिवारातील शेती पाण्याखाली गेली.(Marathawada Rain Alert)

बीड जिल्ह्यातील १७ महसुली मंडळांत अतिवृष्टी झाली. केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण ९० टक्के भरले असून खबरदारीचा उपाय म्हणून चार दरवाजे उघडण्यात आले. धरणातून ३४९४.२८ क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले, त्यामुळे पाच गावांतील शेतजमिनींमध्ये पूर आला.

कळंब तालुक्यात सुबराव शंकर लांडगे (६०) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे.

बीड तालुक्यातील राजाभाऊ टिंगरे यांना मात्र सुखरूप वाचवण्यात प्रशासनाला यश आले.

नांदेड जिल्हात २७ मंडळांत अतिवृष्टी झाली असून किनवट शहरात पावसाचे पाणी ७०० घरांत शिरले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

इसापूर धरणाचे ९ दरवाजे उघडले असून पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

विष्णुपुरी प्रकल्पाचे ३ दरवाजे उघडून ४२ हजार क्यूसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे.

किनवटजवळ एका स्कूल बसला पूर ओढून नेला, सुदैवाने बस रिकामी होती, मात्र चालकाचा मृत्यू झाला.

कंधार व हिमायतनगर तालुक्यात शेकडो एकर शेती पुराने वेढली आहे.

कोड बाजार येथे भिंत कोसळून दाम्पत्याचा मृत्यू झाला.

हिंगोली जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून हदगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतात अडकलेल्या शेतकऱ्यांनी पाण्यातून मार्ग काढावा लागला.

परभणी जिल्ह्यात पिंगळीत सर्वाधिक पाऊस झाला असून गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या. गोदावरी पात्रातील मुळी निम्न पातळी बंधाऱ्याचे सहा दरवाजे उघडले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात मागील दोन दिवसांत मुसळधार पावसाने ११ महसुली मंडळांत अतिवृष्टी नोंदली गेली. कळंब तालुक्यात एक शेतकरी पुरात वाहून गेला. सीना कोळेगाव वगळता बहुतेक लघु-मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

लातूर जिल्ह्यातील जीवनदायिनी मांजरा धरण शनिवारी दुपारी ९० टक्के भरल्याने ४ दरवाजे उघडले आहेत. नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील परतूर व अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे ओढ्यांना पूर आला. आष्टी–परतूर मार्गावरील श्रीष्टी येथील पूल तसेच शहागड–पैठण मार्गावरील चाँद सूरज नाला वाहून गेला असल्याने वाहतूक बंद झाली.

प्रशासनाचा इशारा 

पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, नदीकाठच्या व खालच्या भागातील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना सुचना 

* नदीकाठच्या व खालच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे.

* धरणांचे दरवाजे उघडलेले असल्याने पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो.

* पूरग्रस्त भागात अनावश्यक प्रवास टाळावा.

* पुल, रस्ते, ओढे पाण्याखाली असल्यास त्यावरून जाण्याचा धोका घेऊ नये.

* पावसाचा जोर सुरूच राहणार असल्याने पुढील दोन दिवस सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : दहीहंडी सोहळा पावसातच; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमराठवाडामराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपाऊसहवामान अंदाजशेतकरी