Marathawada Monsoon Update : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा परिसरात वारंवार येणाऱ्या वाऱ्यांमुळे आणि आकाशात सतत दिसणाऱ्या ढगांमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. (Marathawada Monsoon Update)
सतत वादळी वारे, ढगाळ हवामान आणि मधूनच येणाऱ्या सरी यामुळे मराठवाड्यात पेरणीचा गोंधळ सुरू आहे. मात्र, हवामानतज्ज्ञ डॉ. औंधकर यांनी स्पष्ट सांगितले आहे की, खरा मान्सून १४ जूननंतरच सक्रिय होणार असून, तत्पूर्वी पेरणी टाळणेच योग्य ठरेल.(Marathawada Monsoon Update)
अनेकांनी मे महिन्यातच पेरणीची तयारी सुरू केली. मात्र, हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितले आहे की, हा पाऊस खरा मान्सून नव्हता. हवामानतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर आणि कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले की, १४ जूननंतरच खरा मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होईल.(Marathawada Monsoon Update)
वाऱ्यांचा गोंधळ 'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे!
सध्या वाहणारे जोरदार वारे मान्सूनशी संबंधित नसून ते 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' या पश्चिमेकडून येणाऱ्या हवामान बदलांमुळे होत आहेत. हे वारे ढगनिर्मितीमध्ये अडथळा आणतात आणि त्यामुळे प्रत्यक्ष मान्सून लांबतो, अशी माहिती औंधकरांनी दिली.
पेरणीसाठी 'इतकं' पाऊस होणं आवश्यक!
शेतकऱ्यांनी किमान १०० ते १५० मिमी पाऊस आणि त्यानंतर ५ ते ६ दिवस सतत हलका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. जमिनीतील ओलावा खूपच महत्त्वाचा आहे. तो तयार झाल्याशिवाय पेरणी केल्यास बियाण्यांचे नुकसान होऊ शकते.
लागवडीचा योग्य कालावधी कोणता?
खरीप हंगामातील पेरणीसाठी योग्य कालावधी १५ ते ३० जून दरम्यानचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान खात्याचे अंदाज लक्षात घेऊनच निर्णय घ्यावेत, अशी सूचना कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. डाखोरे यांनी दिली.
चक्रीवादळामुळे आलेला पाऊस
मे महिन्यात झालेला पाऊस हा अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे झाला होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी तो मान्सून समजून पेरणी केली. मात्र बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात ढगांची निर्मिती न झाल्यामुळे प्रत्यक्षात मान्सून महाराष्ट्रात पोहोचलेलाच नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा थोडे कमी राहण्याची शक्यता
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीचा प्रत्येक टप्पा विचारपूर्वक, नियोजनबद्धपणे करणे अत्यावश्यक आहे.
मराठवाड्यात मान्सून येणार कधी?
* मराठवाड्यात मान्सून ९ ते १८ जूनदरम्यान येतो. आपल्याकडे मान्सून पूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होऊन गेला. अनेकांना हा मान्सूनच वाटला. मात्र, मान्सूनला विलंब झाला, असेही म्हणता येणार नाही. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी फार घाई करण्यात अर्थ नाही.
* खरीप पिकांसाठी लागवडीचा कालावधी हा १५ ते ३० जून आहे. ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर, पुढील ५-६ दिवस हलका पाऊस पडायला हवा. अशा परिस्थितीत आपण पेरणी करण्याविषयी सूचना करतो. तूर्तास तरी शेतकरी बांधवांनी घाई करू नये.
अरबी सागरातील चक्रीवादळामुळे पाऊस
मे महिन्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे काही भागांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने मान्सून आगमन जाहीर केले. मात्र, बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात सध्या पुरेशा प्रमाणात ढगांची निर्मिती झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात मान्सून महाराष्ट्रात आलेलाच नाही. - डॉ. श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ
पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी
यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण थोडेसे कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान खात्याचे अंदाज लक्षपूर्वक समजून घेत काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. - डॉ. कैलास डाखोरे, कृषी हवामानतज्ज्ञ, कृ.वि., परभणी