नाशिक : गत दोन दशकांपासून चर्चेत असूनही प्रलंबित राहिलेल्या किकवी धरणाला प्रस्तावित कुंभमेळ्यापूर्वी गती लाभण्याची चिन्हे आहेत. या धरणातून नाशिक शहराला २.४ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.
त्यासाठी किकती धरणाच्या पायाभरणीसाठी प्राधान्याने सुमारे १२५ एकर क्षेत्र संपादित करण्यास जिल्हा प्रशासनाकडून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे किमान सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी धरणांची पायाभरणी पूर्णत्वास जाणार असल्याने बहुप्रतीक्षित धरण होण्याच्या दिशेने पावले पडण्यास सुरुवात झाली आहे.
किकवी धरण नाशिक महापालिकेला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी मंजूर करण्यात आले असून, निविदाप्रक्रिया राबविल्यानंतर प्रकल्प न्यायालयीन कचाट्यात सापडल्याने त्याला विलंब झाला होता. मात्र, किकवी धरणाच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी ७५ टक्के पाणीसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे.
या धरणासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे, ब्राह्मणवाडे, पिंप्री, घुमोडी, शिरसगाव, काचुर्ली, सापगाव, पिंपळद, तळेगाव, अंबोली आदी गावांमध्ये भूसंपादन करावे लागणार आहे.
- हे आहेत किकवीचे फायदे
किकवीमुळे नाशिक शहराची २०५५ पर्यंतची पाण्याची गरज भागू शकणार आहे. या प्रकल्पामुळे शहरामधून वाहत असलेल्या गोदावरी नदीचे पूरनियंत्रण, ०.५० मेगावॅट वीजनिर्मिती तर आदिवासी क्षेत्रात सिंचन व पिण्याच्या पाण्याचा अप्रत्यक्ष लाभ होणार आहे.
गंगापूरसाठी बॅक सपोर्ट
नाशिककरांची तहान भागविणारे गंगापूर धरण पूर्ण होऊन तब्बल ६५ वर्षे झाली आहेत. त्यामुळे या धरणात गाळसाठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. मेरीच्या २००२ मधील अहवालानुसार गंगापूर धरणाच्या जिवंत साठ्यामधून तब्बल १५४५ दलघफू साठा कमी झाला आहे.
हा साठा पुनर्स्थापित करण्यासाठी या धरणाच्या उर्ध्व बाजूस किकवी नदीवर २.४ टीएमसी क्षमेतेचे नवीन धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी राज्य शासनाने २००९ मध्ये म्हणजे १७ वर्षांपूर्वी २८३.५४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती.
