Jayakwadi Dam Water Update : मराठवाड्याचा जलजीवनाचा आधार असलेल्या जायकवाडी धरण प्रकल्पात एप्रिल महिन्याच्या मध्यावरही समाधानकारक जलसाठा कायम असल्याचे चित्र आहे.(Jayakwadi Dam Water Update)
सध्या धरणात ५५.६२ टक्के जिवंत साठा उपलब्ध असून, गेल्या वर्षी याच काळात हा साठा ४७.४० टक्के होता. त्यामुळे यंदाची स्थिती प्रशासनासाठी दिलासादायक ठरत आहे.(Jayakwadi Dam Water Update)
पाणीपातळी आणि साठ्याची स्थिती
धरणाची एकूण क्षमता १,५२२ फूट असून, सध्या पाणीपातळी १,५१२.७८ फुटांवर आहे. प्रकल्पात एकूण १,९४५.५३४ दलघमी पाणीसाठा असून, त्यापैकी १,२०७.४२८ दलघमी जिवंत साठा वापरासाठी उपलब्ध आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील पाणलोट क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे यंदा धरण दीर्घकाळ पूर्ण क्षमतेने भरलेले राहिले होते.
कालव्यातून विसर्ग सुरू
डाव्या कालव्यातून सध्या २,२०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग डिसेंबरच्या अखेरपासून सुरू असून, तो मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या विसर्गामुळे शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत आहे.
लाखो नागरिकांचा आधार
जायकवाडी धरणावर छत्रपती संभाजीनगरसह जालना, नांदेड, परभणी, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील सुमारे ५५ लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची जबाबदारी आहे.
तसेच वाळूज, चिकलठाणा आणि बिडकीन-शेंद्रा या औद्योगिक वसाहतींनाही याच प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो.
पाणी वापरावर नियंत्रण आवश्यक
सध्याचा जलसाठा समाधानकारक असला, तरी भविष्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेता पाण्याचा वापर काटकसरीने आणि नियोजनपूर्वक करण्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली आहे.
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून, नागरिकांनी तसेच उद्योगांनी पाणी वाचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा जायकवाडी धरणातील जलसाठा समाधानकारक असला, तरी मराठवाड्यातील पाणीटंचाईचा इतिहास लक्षात घेता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
योग्य नियोजन आणि जबाबदार वापर केल्यास येणाऱ्या उन्हाळ्यातील पाणीपुरवठा सुरळीत राहू शकतो.
