Gangapur Dam : यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे अनेक धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. मात्र गेले काही दिवसांपासून अनेक धरणांमधून आवर्तन सोडण्यात आले आहेत. उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नाशिकसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गंगापूर धरणात आजमितीस ५९.११ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे तर मागील वर्षी हाच जलसाठा ७२.४३ टक्के होता.
नाशिक जिल्ह्यातील १३ मार्च रोजी पर्यंतचा पाणीसाठा पाहिला तर कश्यपी धरणात ८४.१८ टक्के, गौतमी गोदावरी प्रकल्पात ८६ टक्के, आळंदी धरणात ४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच पालखेड धरणात ५७. ८९ टक्के, वाघाड धरणात ३८.१८ टक्के, ओझरखेड धरणात ७०.४२ टक्के, पुणे गाव धरणात ४९.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
तसेच दारणा धरणात ५६.६५ टक्के, भावली धरणात ५० टक्के, मुकणे धरणात ६४.९७ टक्के, नांदूर मध्यमेश्वर धरणात ९९.२२ टक्के, भोजापुर धरणामध्ये १३.८५ टक्के, चनकापूर धरणामध्ये ५७.७७ टक्के, केळझर धरणामध्ये ६२.५९ टक्के पाणीसाठा आहे.
गिरणा डॅममध्ये ४८.४८ टक्के आणि माणिकपुंज धरणात २३.५१ टक्के जलसाठा आहे, असा एकूण २६ प्रकल्पांमध्ये आजपर्यंत ५७.८९ टक्के जलसाठा शिल्लक आहे, हा जलसाठा मागील वर्षी आजच्या दिवशी ४९.३६ टक्के इतका होता.
दारणा धरणातून आवर्तन
दारणा धरणातून गोदावरी उजवा व डावा तट कालव्यांमार्फत तसेच दारणा, गोदावरी नदीलगतच्या गावांसाठी सिंचन व बिगर सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग यांनी सादर केलेल्या अहवालानुसार धरणातून पाण्याचे आवर्तन ५ मार्च २०२६ पासून सुरू केले आहे.
पाणी शेवटच्या गावांपर्यंत सुरळीत पोहोचावे, यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत कालव्यालगतच्या गावांमध्ये दररोज सकाळी ६ ते ८ या दोन तासांचा कालावधी सोडून २२ तास वीजपुरवठा खंडित ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
आपल्या घरगुती सिलेंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे, हे कसं ओळखायचं, पहा ही सोपी ट्रिक
