Cold Weather : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे काहीसे सौम्य वाटणारे थंडीचे वातावरण पुन्हा एकदा जोमाने परतले आहे. आकाश निरभ्र होताच उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात हुडहुडी भरवणारा गारठा जाणवू लागला असून राज्याच्या अनेक भागांत किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार असले तरी थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
ढग हटताच तापमानात घसरण
डिसेंबरअखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र, ढग हटताच किमान तापमानाचा पारा पुन्हा खाली घसरू लागला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पहाटे आणि रात्री गारठा अधिक तीव्रतेने जाणवत असून नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा उच्चांक
उत्तर महाराष्ट्रात थंडीने चांगलाच जोर धरला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात आज किमान तापमान ७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
मोहोळ येथे ७.१ अंश, धुळे येथे ७.३ अंश, तर जेऊर येथे ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
तापमानातील या घसरणीमुळे पहाटेच्या वेळी गारठा अधिक जाणवत असून शेतकरी आणि कामगार वर्गावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.
विदर्भात तापमानात सौम्य वाढ
राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत विदर्भात थोडे वेगळे चित्र पाहायला मिळाले. कालच्या तुलनेत काही ठिकाणी किमान तापमानात सौम्य वाढ नोंदवण्यात आली आहे. गोंदिया येथे किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके होते, तर इतर जिल्ह्यांमध्येही तापमान १० अंशांच्या पुढे राहिले आहे. मात्र, पहाटे गार वारे आणि धुक्यामुळे थंडीची तीव्रता जाणवत आहे.
पुढील काही दिवस थंडी कायम
हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात चढ-उतार होत राहतील. मात्र एकूणच थंडीचा प्रभाव कायम राहणार असून विशेषतः रात्री आणि पहाटे गारठा जाणवेल.
उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय राहणार असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात थंडी अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
विभागनिहाय हवामान अंदाज काय?
कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान तुलनेने मध्यम राहणार आहे.
समुद्राच्या प्रभावामुळे तापमानात फारशी घसरण होणार नसली तरी सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणही पाहायला मिळू शकते.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सकाळी धुक्याची चादर पसरण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान, तर किमान तापमान १२ ते १५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. थंडीचा जोर सकाळी आणि रात्री अधिक जाणवेल.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.
सकाळी धुके आणि रात्री गारठा जाणवेल. थंडीमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
सकाळी धुक्याची चादर पसरण्याची शक्यता असून वातावरण कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* गहू, हरभरा, ज्वारी पिकांना पहाटेचा गारठा नुकसानकारक ठरू शकतो.
* शक्य असल्यास हलके पाणी (संरक्षणात्मक सिंचन) द्यावे, त्यामुळे गारठ्याचा परिणाम कमी होतो, असा सल्ला देण्यात आला आहे.
Web Summary : Maharashtra is bracing for changing weather. Stay updated on the latest forecast and prepare for expected conditions across the state. Check for alerts and plan accordingly.
Web Summary : महाराष्ट्र मौसम में बदलाव के लिए तैयार है। नवीनतम पूर्वानुमान पर अपडेट रहें और राज्य भर में अपेक्षित स्थितियों के लिए तैयारी करें। अलर्ट की जाँच करें और उसके अनुसार योजना बनाएं।