जळगाव : दुष्काळ शमन व मृदा संवर्धन योजनेअंतर्गत मारवड येथे माळण नदीवर बांधण्यात आलेल्या आर्च टाईप बंधाऱ्यामुळे परिसरातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे पाणीटंचाई दूर होऊन शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे.
अनियमित पर्जन्यमानामुळे पावसाळ्यानंतर नदीपात्र कोरडे पडत होते. मात्र, सुमारे दोन कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे पाणीसाठा कायम राहू लागला आहे. या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बंधाऱ्याच्या रचनेत १.२० मीटर उंचीचे आर्च (कमानीच्या) आकाराचे बांधकाम करण्यात आले आहे.
बोअरिंग होलमुळे पाणी जमिनीत झिरपू लागले
नदीपात्रात ७५ ते १०० फूट खोल बोअरिंग होल करण्यात आले आहेत. त्यामुळे पाणी जमिनीत झिरपत राहून भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. तसेच अतिवृष्टीच्या काळात पुराचे पाणी संथगतीने वाहत राहिल्याने मृदाक्षरण थांबले असून सुपीक गाळ साचल्याने जमिनीची गुणवत्ता सुधारली आहे.
बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस पाणीसाठा असून खालच्या बाजूस नदीपात्र कोरडे असल्याचे चित्र दिसून येते. या बंधाऱ्यामुळे परिसरातील पाणीसाठाही चांगलाच वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाणीटंचाईतून मुक्तता याली आहे.
मारवड, गोवर्धन, बोरगावातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी
या बंधाऱ्यामुळे भैरवनाथ मंदिर परिसरातील विहिरींसह मारवड, गोवर्धन व बोरगाव गावांतील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मारवड विकास मंच व ग्रामस्थांच्या सहकार्याने बंधाऱ्यात साचलेला गाळ काढून आवश्यक ठिकाणी पाणी अडविण्याचे नियोजन असल्याची माहिती मंचप्रमुख राकेश गरव यांनी दिली आहे.
