मुंबई : हवामान अंदाज वर्तविणे हे एक जटील विज्ञान आहे. त्यात विविध ज्ञानशाखांचा एकाच वेळी समावेश होतो. सध्या जगभर वेगाने होणाऱ्या हवामान बदलामुळे कमी कालमर्यादेत खूप पाऊस पडणे आणि त्यातून अचानक पूर येणे, दरडी कोसळणे अशा मोठ्या दुर्घटना घडतात.
त्यामुळे येणाऱ्या काळात हवामान अंदाज वर्तवणे हे आव्हानात्मक होणार आहे, असे हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणाले. पर्यावरण दक्षता मंडळ व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित शाश्वत विकास संकल्पना शिबिरात ते बोलत होते.
पर्यावरण रक्षण हा बहुआयामी व गुंतागुंतीचा विषय असून, त्याच्या मुळाशी जायचे असल्यास अनेक पैलूंवर चिंतन व कृती आवश्यक असते, याकडे पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी लक्ष वेधले.
जगभर प्रचलित विकासाचे रूप शहरीकरण व औद्योगिकरणावर भर देणारे असून, चुकीच्या धोरणांमुळे जलस्रोत, शेती व वनांची हानी होत आहे.
जनसहभागातून योग्य पावले उचलली तर जल संरक्षण शक्य होईल, असे देवराई अभ्यासक डॉ. उमेश मुंडल्ये यांनी सांगितले.
संशोधक डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी शारीरिक ताकद व जैवइंधनांपासून खनिज इंधनांपर्यंतच्या स्थित्यंतरातून झालेली तापमानवाढ रोखण्यासाठी नवीकरणीय ऊर्जेचा वापर आवश्यक झाल्याचे मत व्यक्त केले.
डोंबिवलीचे उद्योजक रमाकांत बारी यांनी पर्यावरण रक्षणाची स्पष्टता आल्याने आता काय कृती करावी हे लक्षात आल्याचे सांगितले.
नाशिकचे आर्थिक सल्लागार शंकर फुटाणे यांनी प्लास्टिक टाळण्यापलीकडे आर्थिक जागृतीसोबत पर्यावरण जागृतीची गरज स्पष्ट झाल्याचे सांगितले.
अधिक वाचा: एप्रिलच्या मदतीचा छदाम सुद्धा आला नाही; 'मे'ची मदत नक्की मिळणार का?