उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात भीमा नदीत विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून २२३६० क्युसेव क्यूसेक इतका तर उजनीतून ४१६०० क्युसेकचा विसर्ग सोडल्याने पंढरपुरात ६३ हजार ९६० इतका विसर्ग झाला आहे. त्यामुळे पंढरपुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
पंढरपुरात जुना दगडीपूल पाण्याखाली गेला आहे. तालुक्यातील आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोणत्याही क्षणी पाण्याखाली जातील अशी परिस्थिती आहे. बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पाण्याने चंद्रभागेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरे पाण्याखाली गेले आहेत.
आषाढी यात्रा काळात पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रशासनाने आषाढीपूर्वीच चंद्रभागेच्या पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. पुंडलिक व इतर मंदिरे पाण्यात अर्धी बुडाली आहेत. महाव्दार, विप्रदत्त घाटाला पाणी लागले आहे. त्यामुळे भाविक घाटाच्या पायऱ्यांवर थांबून स्नान करत असल्याचे चित्र आहे.
'हे' बंधारे पाण्याखाली
पटवर्धन कुरोली, गुरसाळे, इसवावी, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, खरसोळी, पुळूज हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जाऊ लागले आहेत.
प्रशासनाकडून आपत्कालिन व्यवस्था
आषाढी यात्रेला येण्यासाठी पालख्या, दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. त्यामुळे चंद्रभागा स्नानासाठी, विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दीही वाढत आहे. त्याचा विचार करून स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना नदीपात्रात सुरक्षा पुरविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीम स्पीड बोटीसह तैनात करण्यात आली आहे.
उजनी व वीर धरणात पाणीसाठा करण्याची क्षमता निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांतील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दि. २८ जूननंतर विसर्ग बंद करण्यात येणार आहे. चंद्रभागेत भाविक, वारकऱ्यांना स्नान करता यावे, जीवितहानी होणार नाही. त्याची दक्षता घेत केवळ दोन हजार क्युसेकचा विसर्ग आषाढी यात्रा काळात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ तीन दिवसच नदीला पूरसदृश परिस्थिती असणार आहे. - जयकुमार गोरे, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री.
हेही वाचा : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप