ऐन नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने सुमारे १६ तास पडण्याचा विक्रम केला असून, शनिवारी (दि.१) दुपारनंतर थोडीशी विश्रांती घेतली होती. मात्र, सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पाऊस कोसळण्याची चिन्हे निर्माण झाली होती. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात नुकसान झाल्याची नोंद सायंकाळपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झालेली नव्हती.
यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस पडला. मात्र, पावसाचे महिने मानल्या जाणाऱ्या जून, जुलै या दोन महिन्यात पाऊस या महिन्यांच्या सरासरीपेक्षा कमीच पडला. ऑगस्ट महिना सुरू होताच पुन्हा दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली.
सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाचा जोर कायम होता. वादळी वाऱ्यासह जोरदार पडलेल्या या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात घरे, गोठे, पाळीव प्राणी, खासगी, सार्वजनिक मालमत्ता आणि शेतीचे २० कोटी रुपयांहून अधिक नुकसान केले.
ऑक्टोबर महिन्यातही संपूर्ण महिनाभर पावसाचा मुक्काम राहिला. या परतीच्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. नोव्हेंबर महिना सुरू होताच पाऊस परतेल, असे वाट होते. मात्र, शुक्रवारी (दि. ३१) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. रात्रभर मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर शनिवारी दुपारी एक-दीड वाजेपर्यंत कायम होता.
दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. उन्हाचे दर्शन होताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र, पुन्हा काही वेळातच अंधारून आले आणि पाऊस सुरू झाला. सायंकाळी पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी पावसाळी वातावरण कायम होते. वातावरणात गारवाही आला होता. रात्री पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता वाटत होती.
मुक्काम अजून वाढणार?
हवामान खात्याने पावसाचा जोर २ नोव्हेंबरपासून कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तरीही ७ नोव्हेंबरपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा मुक्काम राहणार असल्याचाही अंदाज आहे.
जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी (मिमीमध्ये)
| मंडणगड | १८.३० |
| दापोली | २८.२५ |
| खेड | ३२.०० |
| गुहागर | ६८.२० |
| चिपळूण | २६.३० |
| संगमेश्वर | ३६.४० |
| रत्नागिरी | ५२.०० |
| लांजा | ११३.८० |
| राजापूर | ३७.१० |
| एकूण | ४१२.६ |
| सरासरी | ४५.८४ |